Friday 14 May 2010

खबर

खबर


जयदेव डोळे


जनशक्ती वाचक चळवळ, पृष्ठे : १५२, मूल्य : १२० रूपये


तें, ती आणि तो
१९ मेस विजय तेंडुलकर वारले. साहजिकच मराठी वृत्तवाहिन्या व वृत्तपत्रे यांना दु:ख झाले. तॆंडुलकरांचं मोठेपण सर्वांनी सार्थपणे दाखवलं. त्याच वेळी हिंदी आणि इंग्रजी वृत्तवाहिन्यांना तेंडुलकरांच्या निधनापेक्षा एका तरूणीच्या खुनाचं जास्त महत्व वाटलं. इतकं की विजय तेंडुलकर अब नही रहे, अशी सरकती ओळही कोणीही दाखवली नाही. संध्याकाळी केव्हा तरी त्यांची छोटीशी बातमी कशीबशी नाइलाजास्तव झळ्कली. ती आरूषी तलवार मात्र अजूनही माघार घ्यायला तयार नाही. तिचा भयंकर मृत्यू दुप्पट वेगानं जिवंत होऊन नोईडाचे पोलिस आणि सरकारी यंत्रणा यांचा समाचार घेतो आहे. मृत्यू साधा व विनात्रास असला की त्याची नोंद घ्यायची नाही. तो क्रूर, हिंस्त्र आणि अचानक असेल तर मात्र त्याची खबर सर्वाना द्यायची असा जणू सा-या माध्यमांचा रिवाज झाला आहे. तेंडुलकर वृद्ध होते. मृत्यूची वाट पाहात होते. तें जाणारच होते, तरीही त्यांचा मृत्यू इतकी अवहेलना करण्याएवढा मामुली नव्हता. आरूषी तर तेरा वर्षांची कोवळी पोर. तिनं भरभरून जगणं अपेक्षित होतं, तिचं जीवन सुखी होतं, ददात कशाचीही नव्हती. तिचा मृत्यू मात्र फार निर्घृण आणि हकनाक झाला. त्याचं रहस्य अजून उलगडत नाही. तिच्या मृत्यूनं तेंडुलकरांच्या मृत्यूवर प्रसिद्धीच्या बाबतीत मात केली. हिंदी वृत्त वाहिन्यांना आरूषीच्या मृत्यूनं मोहवलं. हेलावलं नाही. टीव्हीसाठी सगळा मसाला असलेला तिचा मृत्यू तेंडुलकरांच्या अगदीच नीरस, पूर्णपणे अपेक्षित व नाट्यशून्य मृत्यूपुढं उजळला. चमकला. पराभूत माणसांच्या लढायांचा लेखक असे म्हणवले जाणारे तॆंडुलकर त्यांच्या मृत्यूच्या प्रसिद्धीच्या लढाईत पराभूत झाले. सरळसोट जिंदगीत काही नाट्य नसतं, म्हणून हिंसा व जंगलीपणा यामध्ये तेंडुलकर आपल्या मरणात कसलंही नाट्य ओतू शकले नाहीत. ते अस्सल पत्रकार व नाटककार होते. नाट्यमय घटना किंवा घटनांनी भरलेलं जगणं ते टिपायचे आणि समाजाला सादर करायचे. लोकांनाही तो हिंस्त्रपणा, भडक व बटबटीत जंगलीपणा पाहायला आवडू लागला. टीव्ही नेमकं हेच करतो. किंबहुना घटना, त्यातील क्रौर्य, अमानुषता, मूल्यहीनता या सा-या बाजू टीव्ही दाखवतो व त्यावरच इतर माध्यमांवर बाजी मारतो. सिनेमातही हे सारं असतं. ते कृत्रिम, सुरचित, व वारंवार प्रयत्नांतून साकारलेलं असतं याची जाणीव प्रेक्षकांना असते. टीव्हीचं तसं नाही. तो घरात असल्यानं व त्यानं वास्तवता, प्रत्यक्षता, समक्षता यांच्याशी आपलं नातं जोडल्यानं त्याचं हिंस्त्रपण दाखवणं अधिक आकर्षक असतं. त्याला जिवंततेचा स्पर्श झालेला असतो. ३५-३० वर्षांपूर्वी तेंडुलकर असाच अमानुषपणा व मानवी बेभानपणा बघायला कुठंही जायचे. तेव्हा त्यांच्याजवळ टीव्हीचा कॅमेरा असता तर जे आज पाहून लोकं खिळून जातात, ते त्यांना तेव्हाच बघायला मिळालं असतं. टीव्ही माध्यमाचं मर्म तेंडुलकरांनीच ओळखलं होतं; म्हणून त्यांनी माणसाचं अध:पतन किंवा जंगलीपण रंगमंचावर आणून ठेवलं. याचा अर्थ आजच्या टीव्हीचा पाया त्यांनी रचला. सेक्स, क्राईम, सिनेमा, व्हायलन्स या चार गोष्टी टीव्हीला फार म्हणजे फार जिव्हाळ्याच्या. आरुषीच्या मरणात पोलिसांनी यातल्या तीन गोष्टी आणून सादर केल्या. पहिल्या दिवसापासूनच सारी हिंदी चॅनल्स त्या दिशेनच चालत होती. त्यांना भरपूर मसाला त्यात सापडला.
हे एवढं जिवंत क्रौर्य बघत असताना सखाराम बाईंडर, घाशीराम कोतवाल, गिधाडे, आक्रोश, अनकही, सामना, सिंहासन आदी तेंडुलकर लिखित कलाकृतींमधलं जंगलीपण जुनं व थंड वाटणं साहजिक आहे. नाटकामधलं हिंस्त्रपण जुनाट आणि टीव्हीमधलं ताजंतवानं, नवं वाटतं यात तेंडुलकरांच्या लेखनाचा पराभव झाला. त्यांच्या दृष्टीचा नाही.

No comments:

Post a Comment