Friday 14 May 2010

नोबेल ललना

नोबेल ललना


मीरा सिरसमकर


मेहता प्रकाशन, पृष्ठे : २३०, मूल्य : १८० रुपये



१८६४ च्या सुमारास रसायन्शास्त्रज्ञ आल्फ्रेड नोबेल यांनी नायट्रोग्लिसरीन आणि केसलगुर या दोन पदार्थांवर रासायनिक प्रक्रिया करून "डायनामाईट" हे स्फोटक तयार करण्याचे नवे तंत्र शोधले. त्याचप्रमाणे नायट्रोग्लिसरीनमध्ये गन कॉटन घालून जेलीग्नाईट नावाचे शक्तिशाली स्फोटक बनवले. पुढे १८७६ च्या सुमारास पोटॅशियम नायट्रेट आणि लाकडाचा लगदा वापरून अनेक प्रकारची स्फोटके तयार केली. परंतु दुर्दैवाने काही लोकांकडून या स्फोटकांचा युद्धाच्या वेळी गैरवापर होऊ लागला. त्याचप्रमाणे ही स्फोटके तयार करण्याच्या कारखान्यात योग्य सुरक्षा यंत्रणा नसल्यामुळे अनेक वेळा स्फोट होत असत. अशा स्फोटांमुळे किती तरी कामगारांचा भीषण मृत्यू होत असे. आल्फ्रेड नोबेल यांचे बंधू एमिल यांचेही अशा स्फोटादरम्यान कारखान्यात निधन झाले. या अपघातानंतर युरोपमधील काही लोक नोबेल यांना मृत्यूचा व्यापारी म्हणून संबोधू लागले. डायनामाईट आणि विविध प्रकारच्या स्फोटकांच्या शोधामुळे नोबेल यांचा आर्थिक फायदा झाला आणि अनेक जणांना मृत्यूच्या वेदीवर चढावे लागले, अशी उघड उघड टीका होऊ लागली. या टीकेनंतर ते खूप व्यथित झाले.

खरं तर कठीण कातळ, खडक फोडून रस्तेनिर्मिती करणे, मोठमोठ्या डोंगरांमध्ये बोगदे निर्माण करून वाहतुकीचा मार्ग आखणे, बांधकामाच्या वेळी मोठमोठ्या दगडांचा अडसर दूर करणे, खाणकामाच्या वेळी भुयारी मार्ग निर्माण करणे, पृथ्वीच्या पोटात दडलेल्या खनिजांचा आणि दुर्मिळ मूलद्रव्यांचा शोध घेणे, अनेक रासायनिक प्रक्रियांच्या वेळी घटक पदार्थ म्हणून वापर करणे अशा किती तरी लहान मोठ्या बाबतीत स्फोटकांचा वापर अत्यावश्यक असतो. परंतु वैज्ञानिक शोधांचा गैरवापर करणारी मूठभर माणसे या महत्वपूर्ण गोष्टींकडे दुर्लक्ष करून समाजाला त्या शोधांच्या आधारेच विध्वंसाकडे नेतात.

शस्त्रास्त्र म्हणून युद्धकाळात माणसे मारण्यासाठी या स्फोटकांचा वापर जेव्हा अति प्रमाणात वाढला, तेव्हा सह्र्दयी सर आल्फ्रेड नोबेलचा भ्रमनिरास झाला. शास्त्रांच्या प्रगतीमुळे व त्यामुळे उपलब्ध होणा-या शोधांमुळे मानवी जीवन अधिक सुखकर आणि सुकर व्हावे, अशी ख-याखु-या शास्त्रज्ञांची इच्छा असते. भौतिक जगातील शास्त्रज्ञ म्हणजे कळकळीने काम करणारी माणसे असतात. त्यामुळे आपल्या वैज्ञानिक शोधाचा वापर विघातकतेसाठी होत असल्याचे पाहून उत्कर्षदायी व प्रगतीशील समाजाचे स्वप्न पाहणा-या सर आल्फ्रेड नोबेलना आयुष्याच्या उत्तरार्धात निराश वाटू लागले. आपण आयुष्यभर कमावलेल्या संपत्तीचा आपल्या मृत्यूनंतर योग्य विनियोग व्हावा असा विचार त्यांच्या मनात घोळू लागला.

जगभरातल्या शास्त्रज्ञ, विचारवंत, संशोधकांनी काही तरी सकारात्मक, भरीव कार्य करावे, ज्यायोगे नवनवे शोध लागतील, निसर्गातील गूढ उकलतील, आणि त्यांच्या साहाय्याने अखिल विश्वातील मानव जातीचा विकास होईल, त्याचप्रमाणे साहित्यातून आणि शांततेच्या मार्गावरून मानवतावाद वाढीस लागेल, अशा संकल्पनेतून त्यांच्या मनात नोबेल पुरस्काराची कल्पना आकार घेऊ लागली आणि २७ नोव्हेंबर, १८९५ रोजी त्यांनी ही योजना आपल्या मृत्यूपत्राद्वारे सर्वांसमोर मांडली. सॅनरेमो येथे त्यांचा १० डिसेंबर, १८९६ रोजी मृत्यू झाला. जवळपास एकतीस दशलक्ष स्वीडिश क्रोनर एवढी रक्कम त्यांनी नोबेल पुरस्कार फाऊंडेशनला दिली.

विज्ञानातून आधुनिकता, साहित्यातून भावसृजनात्मकता व संस्कृती संवर्धन आणि शांततेच्या प्रसारातून स्थैर्य यांच्यामुळेच मानवाचा प्रवास सुखकर होणार आहे, हे जाणून त्यांनी नोबेल पारितोषिके देण्यासाठी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, शरीरविज्ञान/वैद्यकीय, साहित्य आणि शांतता या पाच शाखांची निवड केली.

No comments:

Post a Comment