Sunday 17 October 2010

तमाशा विठाबाईच्या आयुष्याचा

तमाशा विठाबाईच्या आयुष्याचा - योगिराज बागूल
राजहंस प्रकाशन
पृष्ठे - २००, मूल्य - १७५ रुपये

भर पावसाळ्याचे दिवस होते. पाऊस ये म्हटलं की, बदबद येई. पण थांब म्हटल्यावर थांबत नसे. ज्येष्ठ जाऊन अर्धा आषाढ संपत आला होता. तमाशांची फिरती बंद होती. पण पोटातली भूक थोडीच थांबणार होती? पिल्लांच्या चोचीत भरविण्यासाठी विठाला हातपाय हलवणं भागच होतं. अशा दिवसात फडातल्या निवडक आणि आवश्यक तेवढ्याच कलाकारांना घेऊन ती पुण्याच्या, कोल्हापूरच्या, जालन्याच्या किंवा मुंबईच्या थिएटर्समधून बारी करीत फिरत असे.
विठासाठी तो पाणकळा तसा जडच होता. ती पाच महिन्यांची गरवार होती. जीव जड वाटत असे. हिंडणं फिरणं खूप जीवावर येई. बोर्डावर पाय ठेवण्यास नकोसं वाटे. अशातच ’आमच्या थिएटरसाठी तुमचा संच पाठवा,’ म्हणून जालन्याच्या बन्सीकाकानं भाऊ-बापूच्या ठेकेदाराला निरोप पाठवला. ठेकेदारानं बापू आणि विठासह बारा पंधरा कलाकारांचा संच बन्सीकाकाच्या थिएटरमध्ये जालन्याला पाठवला. बन्सीकाकाच्या थिएटरमध्ये प्रत्येक कलावंतीण रसिकांच्या आवडीची लावणी गवळण गोड आवाजात गाऊन आणि अंगातून पाणी निचरूपर्यंत नाचून सादर करी. बन्सीकाकानं सा-या शहरात आणि आजूबाजूच्या खेड्यापाड्यात ’आज रात्री विठा आपल्या अदाचाअनोखा चमत्कार दाखविणार... आजची बारी पाहण्यास विसरू नका...’ अशी जाहिरात केली होती.
विठा साजशृंगार कारत होती. आज विठा गर्द आकाशी रंगाचा छानसा शालू नेसली होती. आता फक्त पायात चाळ बांधायचे बाकी होते... आणि अचानक विठाच्या ओटीत दुखू लागलं. कळा उठू लागल्या. त्या कळांच्या वेदनांनी विठाच्या अंगाचा दाह होऊ लागला. घशाला कोरड पडू लागली. किटिही पाणी प्यायली तरी घसा सुकू लागला. अशातच ओटीत एक जोराची कळ आली आणि विठा खालीच कोसळली. पोटातल्या गर्भाला धक्का बसला. ओटीतून रक्तस्त्राव सुरू झाला. शरीरातलं एवढं सारं रक्त गेल्यामुळे विठाचा चेहरा पार कोमेजून गेला होता. शरीर क्षीण झालं. हातपाय गळून गेले.
बोर्डावर हंसा-मंजुळाची बारी संपली. त्यांनी रसिकांना खूष केलं होतं. त्यानंतर भाऊ-बापूचे कलाकार बोर्डावर आले. नमन झाल्यावर गवळण झाली आणि बारीतल्या लावण्या सुरू झाल्या. एक कलावती छानशी लावणी म्हणू लागली. नाचू लागली. पण रसिकांना विठा हवी होती. त्यामुळे त्यांच्यात चुळबूळ सुरू झाली. नृत्यांगनांची लावणी अर्ध्यावर असतानाच एक प्रौढ मध्येच उठून उभा राहिला.
’ए बाई, बस कर तुझं यीवळणं. आमी विठ्याची लावणी ऐकायला आलोय. असं आलतूफालतू कायबी नही. आम्हाला विठाचं गाणं ऐकायचय.’ तो म्हणाला आणि त्याच्या पाठोपाठ सारेच गोंधळ करू लागले. विठाला ऐकण्यासाठी - पाहण्यासाठी आलेला साराच रसिक उभा राहिला. कालवा वाढला.
’राव, विठाला ऐकायला पेरतं औत सोडून आठ मैलांवरून आलो.’ एकजण शेजारच्याला म्हणाला.
’अहो, माझं पाच वर्षाचं एकुलतं एक पोरगं घरात तापानं फणफणत व्हतं. बायकू म्हणी डॉक्टरकडं जाऊ. नही गेलो अन विठाबाईचा खेळ पाह्यला आलो.’ दुसरा.
’अहो राव, तुमी तर पोराचं सांगताय... घरी माझा बाप शीक हाय. जीव राहतो का जातो असं झाल्यालं. हिथून त्याला दवा न्यायला आलो अन विठाचा खेळ म्हणताना तसाच घुसलो. आता बोला.’ आणखी एक मध्येच म्हणाला.
बन्सीकाकाच्या थिएटरमध्ये प्रेक्षकांचा कालवा खूपच वाढला होता. कोण कोणाला बोलतय, काहीच ऐकण्यास येत नव्हतं. मधूनच एखाद्याचं पागोटं सुटत होतं. ते सावरता सावरता त्याचं कोपर दुस-याच्या टोपीला लागून ती खाली नळकत होती. गोंगाट वाढतच चालला होता. थिएटर गच्च भरलं होतं. बन्सीकाका रसिकांना वस्तुस्थिती सांगण्याचा प्रयत्न करत होता. पण गोंधळ इतका होता की, चार माणसांच्या पलीकडे त्याचा आवाज जात नव्हता. बोर्डावरील सर्व कलाकार स्तब्ध उभे होते. थिएटरच्या हौद्यात रसिकांचा गोंधळ शिगेला पोहोचला होता. त्यांचा कालवा विठाच्या कानापर्यंत येऊ लागला. आडवी झालेली विठा तटकन उठली. शृंगाराच्या खोलीत गेली. एका मोठ्या उपरण्यानं पोट आणि ओटी करकचून आवळून बांधली. रक्तानं माखलेलं पातळ बदललं. पुन्हा साज चढवला. बापू, शंकरनं, बन्सीकाकानं विठाला परावृत्त करण्याचा प्रयत्न केला पण तिनं कुणाचच ऐकलं नाही.
पायात चाळ बांधून विठा जशी बोर्डावर आली, तसे रसिकांचे पागोटे आणि शेले हवेत उडू लागले. वाकून पायरीच्या पाय पडत विठा बोर्डावर आली.हात लावून ढोलकी-तुणतुण्याच्या आणि पेटीच्याही पाया पडली. समोर येऊन डोक्यावरून पदर घेऊन रसिकांना नमस्कार केला. तसं सारं शांत झालं. काही सेकंद थिएटरमध्ये कमालीची शांतता पसरली.
... आणि मग ढोलक्याची चाटी-बायांवर जशी थाप पडली, तशी ढोलकीच्या तालावर विठाचे पाय थिरकू लागले. तिच्या पायातली घुंगरं बोलू लागली. विठा धुंद होऊन नाचू लागली. नृत्याचा एकेक आविष्कार सादर करू लागली. रसिक खूष होऊन हाळ्या-शिट्या मारू लागली. एक रुपयाच्या नोटेपासून शंभरीच्या नोटीपर्यंत बोर्डावर नोटांचा जणू सडा पडला होता. विठाला पाय ठेवण्यास जागा नव्हती. रसिकांकडून मिळालेली दाद पाहून विठा पोटातलं दु:ख विसरून गेली. विठाच्या टिपेच्या आवाजातले बोल सा-या थिएटरमध्ये घुमू लागले. शेवटचा अंतरा गायल्यावर पुन्हा मुखडा गाऊन जोरदार झटक्यावर विठाची पावलं स्थिर झाली. तसा नख-यानं हलक्याच पुढं येऊन तिनं रसिकांना मुजरा केला आणि गर्रकन पाठीमागं फिरून विंगेत निघून गेली. विठा बोर्डावरून निघून गेली तरी रसिक टाळ्या वाजवतच होते.
पाठीमागं येताच विठा पटकन खाली बसली. तिच्या अंगाला दरदरून घाम फुटला होता. ओटीपोटाला आवळलेली उपरण्याची गाठ तिनं ढिली केली. नाचून गाऊन थकल्यामुळं कोरडा पडलेला घसा पाण्याचा एक मोठा घोट घेऊन ओला केला. थकवा तर कमालीचा आला होता. हातापायांसह सारं शरीर निस्तेज निस्तेज झाल्यासारखं वाटत होतं. बराच वेळ विठा तशीच पडून राहिली.

गुलाम

गुलाम : अच्युत गोडबोले, अतुल कहाते
मनोविकास प्रकाशन, पृष्ठे : ३७६, मूल्य : ३७० रुपये

गुलामगिरीच्या विरोधातील चळवळी

गुलामगिरीच्या विरोधात संघटना आणि चळवळी एकोणिसाव्या शतकात जोर धरायला लागल्या. ’अमेरिकन ऍंटी स्लेव्हरी सोसायटी (एएएस)’ या समतावादी विचारांच्या गो-या लोकांनी उभ्या केलेल्या भूमिगत संघटनेची स्थापना १८३२-३३ साली फिलाडेल्फियामध्ये झाली. पुढची काही वर्ष एएएसनं गुलामगिरीच्या विरोधात लाखो पुस्तकं, पत्रकं, नियतकालिकं वितरित केली. विल्यम लॉईड गॅरिसन आणि इतर काही जण या संघटनेच्या प्रमुख लोकांपैकी होते. १७९० सालापासून अमेरिकन कॉंग्रेसकडे देशभरातून गुलामगिरीचा निषेध करणारी पत्रकं पाठवली गेली. एएएसचा उदय होण्यापूर्वी तॊ २०-३० च्या संख्येनं असायची. आता तब्बल चार लाख पत्रकं कॉंग्रेसकडे पोचवली जायला लागली. पण त्यांच्याकडे अजिबात लक्ष दिलं जाऊ नये असं दक्षिणेकडॆच्या राज्यातल्या सीनेटर्सनी सुचवलं. १८३६ साली गुलामगिरीच्या विरोधात छापलेलं सगळं साहित्य एकत्र करून फेकून दिलं जावं असं काही जणांनी कॉंग्रेसच्या बैठकीत म्हटलं.
दुर्दैव म्हणजे जरी या संघटनेची निर्मिती चांगल्या उद्देशानं झाली असली तरी अनेक मुद्द्यांवरून तिच्या संचालक मंडळतल्या लोकांचीच जुंपे, उदाहरणार्थ आपल्या संघटनेत आफ्रिकन बायकांना स्थान दिलं जावं का नाही, हा वादाचा मुद्दा ठरला. मग या संघटनेत १८४० साली फूट पडून एक वेगळीच संघटना तयार झाली. गॅरिसनला पकडून देणा-याला जॉर्जिया सरकारनं ४,००० डॉलर्सचं बक्षीस जाहीर केलं. ’लिबरेटर’ किंवा ’अपील’ या नावाच्या भूमिगत संघट्नांची गुलामगिरी विरोधातली नियतकालिकं वितरित करत असताना कुणी पकडलं गेलं तर त्या माणसाला नॉर्थ कॅरोलिना राज्यात १,५०० रुपयांचा दंड केला जायचा. या नियतकालिकांच्या जॉर्जिया राज्यातल्या एका वर्गणीदाराला त्याच्या घरातून खेचून काढण्यात आलं. मग ओढत नेऊन त्याला चाबकानं फोडून काढलं गेलं, नदीत बुडवलं गेलं आणि जिवंत जाळण्यात आलं. गॅरिसन सापडला तेव्हा त्याच्या गळ्यात दोरी बांधून त्याची बॉस्टनमध्ये रस्त्यात जाहीरपणे धिंड काढण्यात आली. एलिजा लव्हजॉय नावाच्या समतावादी गो-या माणसावरही काळ्यांच्या बाजूनं लिहिल्याबद्दल अनेकदा हल्ले करण्यात आले. शेवटी तर त्याचा खून करण्यात आला. नंतर गॅरिसनवादी लोकांनी शांततामय मार्गानं काळ्या लोकांच्या बाजूनं लढा देत राहण्याचा मार्ग निवडला. पण त्याला फ्रेडरिक डग्लस (१८१८ - १८९५) नावाच्या माणसानं विरोध दर्शवून आपली आक्रमक मार्ग अवलंबणारी एक स्वतंत्र चळवळ उभी केली आणि काळ्यांसाठी एक वर्तमानपत्रंही सुरू केलं.
या डग्लसचं बालपण अंगावर काटाच आणतं. डग्लसला आपण कधी, कुठे जन्मलो, आपले आई-वडील कोण याविषयी काही माहीत नव्हतं. आपण गुलामगिरीत जन्मलो आहोत एवढंच त्याला थोडा मोठा झाल्यावर उमगलं. त्याला त्याच्या मालकाच्या घरी त्याची आजी इतर अनेक मुलांबरोबर सांभाळे. तो १२ वर्षांचा असताना आजी त्याला त्याच्या मालकाच्या दुस-या लांब असलेल्या घरी कायमचंच सोडून गेली. या दुस-या घरी राहयचं नाही हा त्याचा आक्रोश अर्थातच फोल ठरला. तिथे त्याला सांभाळायला असलेली मावशी अतिशय कठोर होती. अतिशय क्षुल्लक कारणांवरून ती तिथल्या मुलांना शिक्षा करायची आणि मारायचीसुद्धा. हताश झालेला डग्लस बरेचदा अर्धपोटीच राही. मग पावाचा तुकडा तोंडात घेतलेल्या कुत्र्याच्या मागे फिरे. न जाणो तो तुकडा त्याच्या तोंडातून चुकून पडला तर आपल्याला खायला मिळेल असं त्या लहानग्याला वाटे. मावशीनं टेबलावरचं कापड साफसफाईच्या वेळी झटकलं की तेव्हा खाली पडणारे अन्नाचे बारीक सारीक तुकडे खाऊन तो पोटातली आग कमी करायचा प्रयत्न करे. पुरेसे कपडे नसल्यानं प्रचंड थंडीपासून बचाव करण्यासाठी तो मक्याची कणसं गोळा करण्यासाठीच्या पोत्यांमध्ये किंवा कपाटांमध्ये शिरून बसून राही.
थोडा मोठा झाल्यावर डग्लसनं गुलामगिरीविरूद्ध बंड करायचा आणि लिहिणं - वाच्णं शिकायचा प्रयत्न केल्यावर त्याला ४० मैल दूरवरच्या शेतावर शिक्षा म्हणून दुस-या मालकाकडे पाठवलं गेलं. तिथे तीन दिवस त्याला चाबकानं फोडून काढण्यात आलं. दिवसभर काम, प्रचंड थंडीत अंगात घालायला कपडे नाहीत, झोपताना बिछाना - अंथरूणाचा पत्ता नाही, अन्न म्हणजे जनावरंसुद्धा खाणार नाहीत असा कसला तरी लगदा आणि हे सगळं कमी म्हणून का काय खूप मारहाण या सगळ्या प्रकारांमुळे डग्लस मनानं पूर्णपणे खचून गेला. रविवारी सुट्टी असताना कसलीही हालचाल न करता हताशपणॆ पडून राही. त्याच्या नव्या मालकानं एका काळ्या बाईला आपली भूक भागवण्यासाठी विकत घेतल्याचं डग्लस बघत होता. मालक रोजच तिच्यावर अत्याचार करायचा. त्यातून तिला मुलं होणार आणि आपल्याला आणखी गुलाम मिळणार याविषयी तो मालक जाहीरपणे अतिशय गुर्मीनं फुशारक्या मारत सांगायचा आणि तसं झालंही. हे सगळं बघून डग्लस अजूनच खिन्न झाला.
एके दिवशी डग्लसला आपल्या आयुष्याची इतकी घृणा आली की त्यानं या सगळ्या व्यवस्थेशी लढा द्यायचं ठरवलं. आपल्या मालकानं मारहाण केली की प्रतिकार करायचा, असा मनोनिग्रह त्यानं केला. त्यानं नव्या मालकाकडून पळ काढून पुन्हा जुन्या मालकाचा आश्रय घेतला. जुना मालक जरा बरा होता. त्यानं डग्लसला पुन्हा वेगळ्या ठिकाणी गुलामगिरीसाठी पाठवलं. तिथे चार धट्ट्याकट्ट्या गो-या कामगारांनी डग्लसला बेदम मारहाण केली. तो तळमळत असताना कुणाचीही त्याला सोडवण्यासाठी पुढे यायची हिंमत झाली* नाही. या सगळ्यामुळे गुलामगिरीतून सुटका करून घ्यायचा डग्लसचा निश्चय अधिकाधिक पक्का होत गेला. शेवटी १८३८ साली त्यानं तिथून कसाबसा पळ काढून न्यूयॉर्कचा आश्रय घेतला. तिथेही पळून आलेल्या गुलामांना हुडकून काढून त्यांच्या मालकांकडे परत पाठवण्यासाठी अनेक हेर फिरतच होते. त्यातून कशीबशी सुटका करून एका जहाज बांधणीचं काम करणा-या गो-या मालकाकडे डग्लस काम करण्यासाठी गेला. तिथे इतर सगळे कामगार गोरे असल्यानं मालकानं डग्लसला कामवर घ्यायला नकार दिला. मग डग्लस मिळॆल ते काम करायला लागला.
एके दिवशी डग्लसच्या हातात विल्यम लॉईड गॅरिसन चालवत असलेलं ’लिबरेटर’ नावाचं वर्तमानपत्र पडलं आणी त्याच्या आयुष्यात एकदम क्रांतीच घडली. मग गॅरिसनचं भाषण ऐकायला डग्लस गेला. या सगळ्यातून डग्लसची वैचारिक जडणघडण निर्मूलनवादी आणि क्रांतिकारी झाली. त्यातूनच तो काळ्यांच्या चळवळीत पूर्ण वेळ पडला.

मार्क इंग्लिस

मार्क इंग्लिस : डॉ. संदीप श्रोत्री
राजहंस प्रकाशन, पृष्ठे - १६५, मूल्य - २०० रुपये

१५ नोव्हेंबर, १९८२ रोजी सकाळी एका स्की विमानात बसून मार्क आणि फिल यांनी ’ग्रॅंड प्लेटो’ या हिमनदीकडॆ झेप घेतली. त्या अफाट बर्फाळ प्रदेशात छोट्या स्की विमानाने या दोघांना सोडले आणि विमान दिसेनासे झाले. आता वर अथांग निळे आकाश, खाली चारही बाजूला क्षितिजापर्यंत पसरलेले बर्फाळ पठार आणि शेजारी माउंट कुकसहित आओराकीची पांढरी शुभ्र पर्वत रांग. दोघांना फक्त एकच्य दिशा दिसत होती - माउंट कुकची. त्या विस्तीर्ण हिमनदीच्या कडॆवर हिमघळी पसरलेल्या होत्या. त्याच्या डोक्यावरील पर्वत शिखरांच्या द-यातून ओघळणारे भयावह हिमधबधबे, क्वचित त्या हिमधबधब्यांच्या डोक्यावर तयार झालेली तरंगती हिमसरोवरे किंवा हिमनदी आणि त्या संपूर्ण पांढ-या पार्श्वभूमीवर अगदी मुंग्यांप्रमाणे दिसणारे दोघेजण. दोघांनी तत्परतेने समोरील हिमघळी पलीकडे धाव घेतली. एक तात्पुरता झोपडीवजा तंबू आडोसा म्हणून तयार केला आणि त्यापुढील मुक्काम ’बिव्हॉक’ करायचे असे ठरवले. बिव्हॉक म्हणजे वाटेतील बर्फामध्ये गुहा खोदायची किंवा एखाद्या हिमघळीमध्ये किंवा दगडाच्या आडोशाने मुक्काम करायचा. पायथ्यापाशी थोडा स्वयंपाक शिजवला, पोटपूजा केली आणि फारसे काही सामान न घेता दुस-या दिवशी पहाटे वर चढायचे असे ठरवले.
सोळा नोव्हेंबरच्या पहाटे पाच वाजता दोघे बाहेर पडले. उभ्या कडक झालेल्या बर्फामध्ये आईस स्क्रू, कॅम्पॉन, बिले देणे फार अवघड झाले होते. तापमान शून्याखाली वीस अंश सेल्शियस होते. एकदा सूर्य उगवला की त्या उष्ण्तेने बर्फ वितळू लागते आणि हिमकडे कोसळण्याची धोके वाढतात. त्यामुळे कठीण कडे नेहेमी रात्री किंवा पहाटे चढायचे असतात. क्वचित प्रसंगी आदल्या दिवशी उष्णतेने पाघळलेले बर्फ पुन्हा रात्री कडक होते आणि त्यावेळी आकारमानाने फुगते. फ्रिजमधील पाण्याने भरलेल्या बाटलीचे टोपण ज्याप्रमाणे फुटते, त्याप्रमाणे त्यावरील हिमकडे सुटतात आणि खाली कोसळतात. हे सर्व धोके त्या दोघांना माहीत होते. अगदी हळूहळू त्यांची प्रगती होत होती. ६०० मीटर्स उंच चढाई करत पूर्व धारेच्या कडेवर येईपर्यंत दुपार झाली होती. पश्चिमेकडे ढग जमा झाले होते. वारा वेगाने वाहात होता. मार्क आणि फिलने ’मिडल पीक’च्या धारेवरच गुहा खोदून मुक्काम करण्याचा निर्णय घेतला. एका बाजूला १००० मीटर्स खोल कॅरोलीन बाजू, तर दुस-या बाजूला ६०० मीटर्स खोल पूर्व बाजू होती. अंग गोठवणा-या वा-याशी युद्ध खेळत त्यांनी ’मिडल पीक’ गाठले तेव्हा संध्याकाळचे सहा वाजले होते. दोघांनी तातडीने गुहा खोदायला सुरुवात केली आणि तात्पुरता निवारा तयार केला. नियतीच्या मनाच्या अंदाज येणे शक्यच नव्हते. हाच निवारा म्हणजे त्यांचे पुढील चौदा दिवसांचे ’मिडल पीक’ हॉटेल.
रविवार, २१ नोव्हेंबर, त्यांचा गुहेतील सहावा दिवस. त्यांनी हिशोब केला. त्यांच्यापाशी आता जगण्याचे केवळ ३६ ते ४८ तास उरले होते. आता अन्न संपून चार दिवस झाले होते. शरीर आता स्वत:चीच साठवलेली उर्जा वापरू लागले होते. त्यांचे वजन झपाट्याने कमी होत होते. त्यांच्या पायातील संवेदना नष्ट झाल्या होत्या. मार्क त्याच्या कुटुंबीयांच्या, लहानग्या ल्यूसीच्या आठवणी फिलला सांगत होता. त्या शांततेचा, त्या एकटेपणाचा, त्या समाधीअवस्थेचा भंग करण्यासाठी मार्क सर्व मार्ग अवलंबत होता. फिल मात्र शांत असायचा. इतका की, ब-याच्य वेळेला मार्क त्याच्यावर चिडायचा.
इकडे खाली पार्क मुख्यालायामध्ये हलकल्लोळ माजला होता. दोघांचे नातेवाईक, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी, राजकीय नेते, देशपरदेशातील गिर्यारोहक, आदी सर्वांनी भंडावून सोडले होते. दोघे पर्वतावर गेले, ते सर्वात महत्वाच्या झोपायच्या पिशव्यादेखील न घेता, याचेच सर्वांना आश्चर्य वाटत होते. वादळ सहाव्या दिवशीसुद्धा शमले नव्हते. प्रचंड हिमवर्षाव चालू होता. माऊंट कुककडे जाणारे सर्व रस्ते हिम वर्षावामुळे आणि हिम कोसळ्यांच्या शक्यतेमुळे बंद केले होते. हेलीकॉप्टर उडण्याचा तर प्रश्नच नव्हता. टास्मान हिमनदीवरील वातमापक येंत्र त्या अफाट वा-याने उडून गेले होते. शतकातील ते सर्वात दिर्घ चाललेले हिमवादळ ठरले होते आणि त्याचे बळी मार्क आणी फिल होते. बॉब मुन्रो हा पार्कचा प्रमुख, त्याने डॉ. डिक प्राइसला सातव्या दिवशी चर्चेला बोलावले. मुद्दा हा की स्लीपिंग बॅगशिवाय ते दोघेजण किती तग धरू शकतील, म्हणजे त्यांच्या सुटकेची आशा किती दिवस धरायची? डॉ. डिक, हा त्यातील तज्ञ, त्याने स्पष्ट सांगितले की जास्तीत जास्त दहा दिवस जिवंत राहण्याची आशा! बॉब मुन्रोने बोटे मोजली आणि अंदाज केला की, आणखी तीन-चार दिवस सुटकेचे प्रयत्न करायला हरकत नाही.
मार्कची मानसिक स्थिती आता दोलायमान होत होती. त्याला रात्री जास्त त्रास होत होता. कधी स्वच्छ पाणी पिण्याचे स्वप्न पडायचे, तर कधी पुस्तकातील स्वयंपाकाचे विविध पदार्थ करण्याचे स्वप्नात दिसायचे. तो जाणीवपूर्वक मागील भूतकाळाचा एक एक दिवस आठवू लागला आणि घड्याळाचा काटा पुढे ढकलू लागला. त्या वेळीच त्याने ठरवले की समजा जिवंत सुटका झालीच तर पुढे आयुष्यभर रोज एक ग्लास्व भरून थंडगार पाणी पिईन.
अद्यापपर्यंत मार्कने तो नेम सोडलेला नाही. रोज सकाळी न चुकता ग्लास भरून बर्फाचे थंडगार पाणी पित असतो.
--------------------------------------------
मार्क इंग्लिस या माणसानं हिमदंशामुळे आपले दोन्ही पाय गमावले. त्यानंतर तब्बल चोवीस वर्षानंतर दोन कृत्रिम पाय लावून तो एव्हरेस्ट शिखरावर चढला. ही आहे मानवाच्या जिद्दीची आणि दुर्दम्य इच्छाशक्तीची एक प्रेरणादायी साहसकथा.

Monday 23 August 2010

मास्तरांची सावली

मास्तरांची सावली : कृष्णाबाई नारायण सुर्वे

डिंपल प्रकाशन,पृष्ठे - १८४, मूल्य - १८० रुपये

सांताक्रूझला बाबुरावाच्या झोपड्यात असताना माझ्याकडे भांडीकुंडी काहीच नव्हती. मास्तर बाहेर गेले की मी चूल पेटवायला काटक्या, कागद गोळा करायची. चुलीवर तीन भाक-या थापायच्या आणि त्या कागदावर काढून ठेवायच्या. एखाद्या दगडावर मिरच्यांचा ठेचा नाहीतर खर्डा वाटून तो भाकरीवर ठेवायची. एक भाकरी मला, दोन मास्तरांसाठी. कित्येक दिवस हेच जेवण होतं आमचं. पण त्यालाही चव असायची. कारण ती प्रेमाचीच चटणी आणि प्रेमाचीच भाकर होती ना! याच झोपड्यात आम्ही एका भयंकर वादळाचा सामना केला होता. ते वादळ आठवलं की अजूनही अंगावर शहारे येतात.

साल आठवत नाही मला. पण त्या वर्षी भयंकर पाऊस पडला होता. प्रचंड वादळ झालं होतं. आधीच आम्ही पार कंगाल झालो होतो. त्यात झोपडीसकट सगळंच वाहून गेलं होतं. फक्त आमच्या अंगावरचे कपडे तेवढे शाबूत राहिले होते. लग्नाला जेमतेम वर्ष झालं होतं. कुसुम रणदिवेंच्या कृपेनं मला मूलबाळ काही तेव्हा झालं नव्हतं म्हणून बरं. नाहीतर आम्ही काय केलं असतं? या विचारानेच आजही अंगावर काटा येतो. तर त्या वादळी पावसातून कशीबशी वाट काढत, एकमेकांना घट्ट धरून, बिलगून आम्ही चाललो होतो. दूरवर एक मशीद दिसत होती. तिथे तरी पोचावं असा विचार मनात चालला होता. पाणी माझ्य कमरेच्या वर पोचलं होतं. मास्तर माझ्यापेक्षा उंच असल्यामुळे त्यांन तितकीशी भीती वाटत नव्हती. पण मी पडले खुजी. तशी मी सर्वच बाबतीत त्यांच्यापेक्षा खुजीच आहे म्हणा. असो. तर त्या पाण्यातून चालताना खाली खड्डा आहे का विहीर काहीच कळत नव्हतं. माझे पाय खाली खेचल्यासारखे होत होते. कुठे वळावं मागे की पुढे? काहीच कळेना. तिथे जवळ्पास मोठमोठी झाडं होती. त्या झाडांवर म्हणे तडीपार केलेले, हद्दपार केलेले लोक बसायचे आणि रात्री चो-या करायला, मारामा-या करायला बाहेर पडायचे. त्यांनी आम्हाला झाडावरून पाहिलं आणि एकदम ओरडले, ’ओ ताई, दादा थांबा तिथंच. पुढे येऊ नका. इकडे खूप पाणी आहे आणि त्या बाजूला तर पूर आलाय.’ असं म्हणून पटापट झाडावरून त्यांनी उड्या घेतल्या. मी क्षणभर घाबरलेच. मनात आलं, आपल्याला घेऊन तर जाणार नाहीत ना? किंवा ही कुणी पाठवलेली माणसं तर नसतील ना! मास्तर म्हणाले, ’किशा, घाबरू नकोस. बघू तर खरं काय करतात ते!’ ती माणसं जवळ आली तसे मास्तर त्यांना विनवू लागले, ’दादा, आम्ही पाया पडतो तुमच्या. इथलं आम्हाला काहीच माहीत नाहीये. एखाद्या सुरक्षित ठिकाणी आम्हाला घेऊन चलता का?’ त्यांनी आम्हाला मशिदीत अगदी सुरक्षितपणे पोचवलं.

मशिदीत आम्हाला आसरा मिळाला खरा, पण आम्ही पार भिजून गेलो होतो. मास्तरांना तर हळूहळू ताप चढायला लागला. मला मात्र काहीच झालं नव्हतं. मशिदीतले लाईटही गेले होते. नुसता अंधार पसरला होता. आधीच उपाशी तापाशी, त्यात हाताशी काही नाही. जे काही होतं नव्ह्तं तेही वाहून गेलं होतं. काय करावं काहीच सुचत नव्हतं. रात्र झाली. मास्तरांचा ताप अधिकच वाढला. त्यांना थंडी वाजू लागली. अगदी थाडथाड उडत होते. मी तर घाबरलेच होते. मशिदीत सगळे मुसलमान होते. त्यांच्यातला एक मौलवी बाबा पेल्यात पाणी घ्यायचा, काहीतरी मंत्र पुटपुटायचा आणि मास्तरांच्या तोंडात विभूती टाकून ते मंतरलेलं पाणी ह्यांना प्यायला द्यायचा. मला ते पटत नव्हतं. विभूती टाकून का कुणी बरं होतं? पण मी काय बोलणार तेव्हा? तो बाबा आपला अला के नामसे’, ’खुदा के नामसे’, ’उसके नामसेम्हणून सारखा यांच्या तोंडात विभूती टाकयचा. मला भीतीच वाटत होती. मनात यायचं, हा माणूस बहुधा ही विभूती खाऊन खाऊनच खलास होणार. शेवटी न राहवून मी त्या बाबाला विचारलं, ’तुम्ही यांच्या तोंडात सारखी सारखी ही विभूती का टाकता?’ तसा तो म्हणाला, ’बहेन, इसको विभूती मत बोलो. ये खुदाका प्रशाद है. ये खाके तुम्हारा जल्दी अच्छा हो जायेगा, चिंता मत करो.’ मी मनातून खचूनच गेले होते, पण परस्वाधीन असल्यामुळे काही बोलता येत नव्हतं.पावसापाण्यातून, अशा अवस्थेत मास्तरांना कुठे घेऊन जाणार होते? शेवटी तिस-या दिवशी पाऊसही उतरला आणि मास्तरांचा तापही. इकडॆ तिकडॆ बघायला लागले, मला खूप बरं वाटलं. मनातून मी त्या बाबाचे आभार मानले. मास्तर हळू आवाजात विचारत होते, ’किशा, कुठे आहोत ग आपण?’ ते तसे ग्लानीतच होते. त्यांना काही आठवत नव्ह्तं. चेहरा अगदी कसानुसा झाला होता. मी बाबांना म्हटलं, ’यांना खूप भूक लागलीय. तीन दिवस पोटात काहीच नाहीये. काही खायला मिळेला का?’ मग मशिदीतल्या माणसांनी रोटी आणि थोडीशी चटणी आणून दिली. मास्तरांनी ती खाल्ल्यावर त्यांना थोडी तरतरी आली. ’भुकेला कोंडा आणि नीजेला धोंडाम्हणतात तसं झालं होतं. जरा भानावर आल्यावर मास्तर म्हणाले, ’किशा, काय खालं असेल ग आपल्या घराचं?’

मी म्हटलं, ’मरू दे ते घर. जाऊ दे. तुम्ही ठीक झालात ना, यातच मला आनंद आहे. घर काय पुन्हा बघू कुठेतरी.’ असं म्हणून मी त्यांना घेऊन मशिदीबाहेर पडले. पुन्हा एकदा उघड्यावरचा संसार नशिबी येतोय का काय असं वाटत होतं. पुन्हा एकदा नव्या घराचा प्रश्न या वादळाने उभा केला होता.

बिलंदर टोपी बहाद्दर

बिलंदर टोपी बहाद्दर : निरंजन घाटे
रोहन प्रकाशन, पृष्ठे : १७६, मूल्य : १०० रुपये

राष्ट्रीय स्मारके विकणारे महाभाग
लोक फसतात म्हणून आम्ही त्यांना फसवतो, असं ब-याच टोपी घालणा-य़ांचं म्हणणं असतं. ’दुनिया झुकती है झुकानेवाला चाहिये’, ही म्हण आपण बरेचदा वापरतो. लोकांच्या डोळ्यात धूळ फेकण्याचं कौशल्य असल्याशिवाय झुकानेवाला दुनियेस झुकवू शकत नाही, हे मात्र इथं लक्षात ठेवायला हवं. नाहीतर बिगबेन स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा किंवा आयफेल टॉवर यांच्यासारख्या वस्तू विकल्याच गेल्या नसत्या.
आर्थर फर्ग्युसन हा असाच एक स्कॉटसमन होता. तो एक उत्कृष्ट ’झुकानेवाला’ होता. आपण लोकांना झुकवू शकतो याची त्याला कल्पना नव्हती. पण जेव्हा आपल्या या गुणांचा त्याला साक्षात्कार झाला तेव्हा त्यानं जगाला थक्क करून सोडलं. १९२०च्या सुमारास तो ट्राफल्गार चौकात उभा असताना आर्थरला त्याच्यातील सुप्त गुणांची जाणीव झाली. एक अमेरिकन माणूस नेल्सनच्या पुतळ्याकडं अनिमिष नेत्रांनी एकटक बघत असताना आर्थरनं बघितला. आर्थर त्या अमेरिकन व्यक्तीजवळ गेला. आपण या लंडनमधल्या सर्व पुतळ्यांचे नि स्मारकांचे अभ्यासक आहोत, अशी स्वत:ची ओळख करून देत त्या अमेरिकन व्यक्तीस त्याने नेल्सनच्या पुतळ्याची माहिती द्यायला सुरुवात केली. ’हा पुतळा इंग्लंडचा राष्ट्रपुरुष मानल्या जाणा-या लॉर्ड नेल्सनचा आहे.’ आर्थर त्या अमेरिकनास माहिती देऊ लागला. ’या देशाचं दुर्दैव असं की आमच्या शासनानं हा पुतळा, हे सिंह, हे कारंजं, तो चौथरा हे सगळं विकायला काढलय. पाच वर्षे चाललेल्या युद्धामुळं आमचा देश कर्जबाजारी झालाय ना,’ चेहरा दु:खी करत आर्थर बोलत होता. त्या अमेरिकन माणसाला आर्थरची कीव आली. ’तुम्हाला खोटं वाटेल, केवळ सहा ह्जार पौंडाला हे स्मारक विकलं जातय आणि दुर्दैव असं की हे काम माझ्यावर सोपविण्यात आलय. कुणातरी जाणकार व्यक्तीच्या पदरी पडायला हवं. या स्मारकाची महती ज्याला कळते त्याने हे घेतलं तर ठीक आहे. नाही तर सगळाच बट्ट्याबोळ.’ आर्थरनं अगदी पडल्या चेहे-यानं त्या अमेरिकनास सांगितलं.
’काय म्हणताय काय, पण तुम्हाला गि-हाईक आलय का?’ त्या अमेरिकन माणसानं विचारलं.
’हो. दोन - तीन गि-हाईकं आलीत खरी, पण त्यातला एकजण तर फ्रेंच आहे. त्याला नेल्सन कसा काय विकणार?’
’तुम्ही मला थोडा वेळ द्याल का? मी माझ्या वरिष्ठांना विचारतो.’ तो अमेरिकन म्हणाला.
’अहो, खरं तर हे सगळं शासकीय गुपित आहे. तुम्ही तुमच्या वरिष्ठांना विचारणार, ते आणखी कुणाला सांगणार, माझी नोकरी जाईल.’ असा संवाद घडला. अखेरीस आर्थरनं त्या अमेरिकन व्यक्तीस एक फोन करायला हरकत नाही असं सांगितलं. त्या माणसानं फोन केला. मग आर्थरनं फोन केला. जर सहा ह्जार पौंडाचा चेक लगेच मिळाला तर व्यवहार पूर्ण करावा, असा आदेश राष्ट्रीय स्मारक समितीच्या अध्यक्षांनी आर्थरला दिल्याची माहिती आर्थरनं त्या अमेरिकनास दिली. त्याचबरोबर हा पुतळा, त्याचा चौथरा, भोवतालचे सिंह, कारंजे वगैरे सुटे करून पेटा-यात बांधून जहाजातून अमेरिकेला पाठवू शकेल, अशा शासनमान्य संस्थेचा पत्ताही आर्थरनं त्या अमेरिकनास दिला.
आर्थरनं ब्रिटीश शासनाच्या वतीने चेक स्वीकारला. पावती पाठवायचा पत्ता लिहून घेतला. त्या माणसाच्या डायरीत कच्ची पावती लिहून दिली. मग आर्थर फर्ग्युसननं लगेच तो चेक वटवला. इकडे तो अमेरिकन आर्थरनं दिलेल्या पत्त्यावर गेला. तिथं त्याचं काम स्वीकारायला त्या कंपनीनं अर्थातच नकार दिला. नेल्सनचं स्मारक ब्रिटीश सरकार कुठल्याही परिस्थितीत विकणं शक्य नाही, हे सांगून त्याला पटेना. मग तो अमेरिकन स्कॉट्लंड यार्डमध्ये पोहोचला. तेव्हा आपण फसलोय हे त्याच्या लक्षात अलं. आर्थर फर्ग्युसनला हे घबाड लाभलं त्यामुळे त्याची तहान वाढली. त्या वर्षीच त्यानं आणखी एका अमेरिकन व्यक्तीस एक हजार पौंडाला ’बिगबेन’ हे घड्याळ विकले. त्याही पुढची गंमत म्हणजे बंकिंगहॅम राजवाड्याच्या खरेदीचा विसार म्हणून त्याने दोन हजार पौंड मिळवले. या तक्रारी अर्थातच पोलिसात नोंदवल्या गेल्या. लंडनमध्ये हा उद्योग करीत राह्यलो तर पोलीस पकडतीलच, पण जर हे अमेरिकन इतके खुळे आहेत तर त्यांच्याच देशात आपण गेलो तर आपल्याला आणखी पैसा मिळेल अशी खूण गाठ बांधून आर्थर फर्ग्युसन १९२५मध्ये अमेरिकेत पोहोचला. अमेरिकेत तर विकण्यासारख्या खूपच गोष्टी उपलब्ध होत्या.
वॉशिंग्टनला पोहोचल्या पोहोचल्या आर्थरनं पहिलं गि-हाईक मिळवलं. एका गुरांच्या व्यावसायिकाला - कॅट्ल रांचरला - त्यानं दरवर्षी एक लाख डॉलर भाड्यानं ९९ वर्षांच्या करारानं व्हाईट हाऊस भाड्यानं दिलं. पहिल्या वर्षीचं भाडं त्यानं आगाऊ घेतलं होतं. एवढा पैसा मिळाल्यानंतर फर्ग्युसनच्या मनात निवृत्तीचे विचार येऊ लागले. पण निवृत्तीपूर्वी एक दणका द्यावा आणि मगच निवृत्त व्हावं. तेव्हा काही तरी धमाल उडवायलाच हवी, असा निश्चय करून तो निवृत्तीपूर्व दणकेबाज कामाची योजना करू लागला.
कसायाला गाय धार्जिणी, या उक्तीनुसार आर्थरकडं या वेळात बळीचा बकरा चालत आला. हा एक धनिक ऑस्ट्रेलियन होता. त्याला आर्थरच्या जाळ्यात फसायला वेळ लागला नव्हता. एका भोजन समारंभात दोघांची ओळख झाली. बोलण्याच्या ओघात आर्थरनं न्यूयॉर्क बंदराच्या रूंदीकरणाच्या कामात त्याचा स्वत:चा मोठा सहभाग असल्याचं या ऑस्ट्रेलियन महाभागास सुनावलं. या रूंदीकरणाच्या आड स्वातंत्र्य देवतेचा पुतळा येत होता. प्रगतीच्या आड भावना येऊ देणं अमेरिकन जनतेस मान्य नव्हतं. मात्र या पुतळ्याला भंगार माल म्हणून विकायलाही शासन तयार नव्हतं. जर योग्य त्या सन्मानासह या पुतळ्याची पुर्स्थापना करायला कुणी तयार असेल अमेरिकन शासन त्या व्यक्तीस किंवा संस्थेस हा पुतळा विकायला तयार होते. मात्र हा व्यवहार आधी उघड करणं म्हणजे जनतेचा प्रक्षोभ ओढून घेणं असल्यानं हा व्यवहार गुप्ततेनं करायला हवा होता, हेही आर्थरनं या ऑस्ट्रेलियन व्यक्तीच्या मनावर ठसवलं. जर हा पुतळा विकत घ्यायचा असेल तर आधी एक लाख डॉलरची अनामत रक्कम जमा करावी लागेल, असंही आर्थरनं त्या ऑस्ट्रेलियन माणसाला सांगितलं. या ऑस्ट्रेलियनानं पुढचे काही दिवस सिडनीशी संपर्क साधून एक लक्ष डॉलर मिळवायची धडपड केली. फर्ग्युसन कायम त्याच्याबरोबर राहात असे. ’चुकून तू हे गुपित फोडशील आणि हा व्यवहार रद्द होईल’, असं तो त्या ऑस्ट्रेलियन गृहस्थाच्या मनावर ठसवीत होता. या दोघांनी स्वातंत्र्यदेवतेच्या पुतळ्यासमोर आपलं छायचित्रंही काढून घेतलं होतं.
ऑस्ट्रेलियातून पैसे यायला वेळ लागला. त्यामुळं फर्ग्युसन अस्वस्थ झाला. त्याच्या अस्वस्थतेमुळे त्या ऑस्ट्रेलियन माणसाचा संशय वाढला. त्यानं एक दिवस ते छायाचित्र पोलिसांकडे दिलं. पोलिसांकडे या व्यक्तीविरूद्ध वेगवेगळ्या नावनं लोकांना राष्ट्रीय स्मारकं विकल्याच्या तक्रारी दाखल झाल्या होत्याच. त्यांना आता ठोस पुरावा मिळाला. त्या ऑस्ट्रेलियन व्यक्तीच्या मदतीनं पोलिसांनी अखेरीस आर्थर फर्ग्युसनला पकडलं. त्याला पाच वर्षाच्या साध्या कैदेची शिक्षा झाली. लक्षावधी डॉलर बॅंकेत ठेऊन आर्थर आत गेला. पाच वर्षांनी त्या रकमेच्या व्याजासह ती संपत्ती घेऊन तो लॉस एंजेलीसला गेला. मग तुरुंगात न जाता लोकांना टोप्या घालत १९३८ पर्यंत राजेशाही जीवन जगला. १९३८ मध्ये स्वत:च्या प्रासादात झोपेतच मरण पावला.

शहाण्यांचा सायकिऍट्रिस्ट

शहाण्यांचा सायकिऍट्रिस्ट : डॉ. आनंद नाडकर्णी
समकालीन प्रकाशन
पृष्ठे - २८०, मूल्य - २५० रूपये

समाजापर्यंत जाऊन भिडायची प्रक्रिया चालू तर झाली होती. तशी एकही संधी आम्ही वाया घालवत नव्हतो. परंतु खर्च वाढत होते. क्लायंटकडून जे शुल्क घेतलं जात असे, ते अतिशय माफक असे. कारण या सेवा नवीन होत्या. ’बोलायच्या’ ट्रीटमेंटसाठी पैसे देणं अनेकांना जड जायचं. संस्थेवर पूर्ण वेळ अवलंबून असणारे कार्यकर्ते कर्मचारी आता चौदापर्यंत पोचले होते. त्यांचं मानधन दर महिन्याला तयार ठेवावं लागत होतं. या सगळ्या पार्श्वभूमीवर माझी गाठ पडली ज्यो अल्वारिस नावाच्या एका व्यक्तीबरोबर. ज्यो अल्वारिस ठाण्यालाच राहणारा. पाश्चात्य संगीतातला दर्दी. स्वत: उत्तम गायक.
’आपण तुझ्या संस्थेसाठी असा एक अफलातून शो करू या, जो आजवर कुणीही या शहरात केला नसेल.’ ज्यो म्हणाला.
रेमो फर्नांडिस, रॉक मशिन, शेरॉन प्रभाकर (आणि ज्यो अल्वारिस स्वत:) असे कलाकार आणायचे. म्हणजे नावीन्य या फूटपट्टीवर हा कार्यक्रम जोरदार होता. नाव ठरलं यूथ २००० एडी. दादोजी कोंडदेव स्टेडियमची तारीख मिळाली १० डिसेंबर १९९२. या त्या तारखेपासून मागे मागे येत संपूर्ण इव्हेंटचं वेळापत्रक तयार झालं. प्रमुख स्पॉन्सरशिपसाठी लागणारी सर्व कागदपत्र घेऊन मी सुनुबेन गोदरेजना भेटायला गेलो. सुनुबेनचा माझ्यावर (का कोण जाणे) पहिल्यापासून लोभ. ’तू गोदरेज सोपला जा. मी आदीशी बोलते.’ आदी म्हणजे गोदरेज. गोदरेज सोपचे सर्वेसर्वा. चार दिवसांनी मी पोचलो त्यांच्या ऑफिसमध्ये. मला फारच छान ट्रीटमेंट मिळाली. आदी गोदरेजनेही माझं म्हणणं छान ऐकलं. माझ्याकडचे स्पॉन्सरशिपचे सगळे कागद त्यांनी नजरेखालून घातले. ’माझी सेक्रेटरी तुला सॅम बलसाराच्या ऑफिसचा नंबर देईल. त्याला जाऊन भेट. तोवर मी हे कागद त्याला फॉरवर्ड करतो. सॅम बलसाराची कंपनी आमच्या जाहिराती आणि प्रसिद्धीचं काम पाहते.’
मी ते नंबर घेऊन बाहेर पडलो. दुस-याच दिवशी सॅम बलसाराच्या एजन्सीमधून फोन... ’धिस इज रिगार्डिंग स्पॉन्सरशिप ऑफ युवर इव्हेंट...’
चक्क पाच लाख रुपयांची स्पॉन्सरशिप सुनुबेनच्या शब्दांनी पक्की झाली होती. इतका मोठा इव्हेंट मॅनेज करायला अनेकजण आपापल्या परीनं झटत होते. नोव्हेंबरच्या दुस-या आठवड्यात सर्वत्र पोस्टर्स झळकली. मोठी होर्डिंग्ज लागली. लोकलच्या डब्यांमध्ये स्टिकर्स लागले. वर्तमानपत्रांमध्य्ये बातम्या-फोटो आले. स्टेशनांवर पत्रकं वाटली जाऊ लागली. तिकिटविक्रीला प्रारंभ झाला. चार डिसेंबरपर्यंत सगळीकडे झालेल्या तिकिटविक्रीचा आकडा सत्तर हजाराच्या घरात गेला होता. आमच्या टीन क्लब, यूथ क्लबची मुलंही तिकिटं खपवण्याचा जोरदार प्रयत्न करत होती. आम्हाला तीन ते पाच लाखांची तिकिट्विक्री अपेक्षित होती. दहा डिसेंबरला कार्यक्रम, तर सहा डिसेंबरपासून स्टेडियम ताब्यात येणार होतं. प्रचंड मोठं स्टेज बांधण्याचं सामान पाचला रात्रीच ट्र्कमधून येऊन पडलं. लाइटस, साऊंडची उपकरणं सहा किंवा सातला येणार. आठला स्टेज सेट कारायचं. नऊला रिहर्सल. दहाला कार्यक्रम.
सहा डिसेंबर एकोणिसशे ब्याण्णव हा दिवस सा-या देशाच्याच इतिहासात एक चक्री वादळ घेऊन आला. अयोध्येच्या बातम्यांकडे लक्ष द्यायला आम्हाला ना वेळ होता, ना वृत्ती.
़़़़़
बाबरी मशीद पडल्याचं वृत्त सर्वत्र पसरलं आणि त्याचा परिणाम जाणवू लागला. तोवर दुपार उलटली होती. आम्ही सारेच सुन्न. शिवनेरी हॉस्पिटलमधल्या आमच्या डे-केअर सेंटरमध्ये या कार्यक्रमाची कंट्रोल रूम होती. रस्त्यावरची रहदारीही संध्याकाळपर्यंत पार आटली. सगळ्या वातावरणात प्रचंड टेन्शन. पुढचे काही दिवस सगळीकडे ’एकशे चव्वेचाळीस’ कलम म्हणजे जमावबंदी लागू होणार अशी बातमी आली. पोलिस स्टेशनवर चौकशी केली. तिथून होकार मिळाला. रात्री पोलिस कमिशनर कार्यालयातून फोन-निरोप, की कार्यक्रमाला दिलेली परवानगी राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव रद्द करण्यात येत आहे. कलाकारांचे ऍडव्हान्सेस, स्टेजवाल्यांचे पैसे, प्रसिद्धीवर झालेला खर्च... सगळंच एका क्षणात धुतलं गेलं होतं. होत्याचं नव्हतं झालं होतं.
सगळ्या वर्तमानपत्रांसाठी घाईघाईनं बातमी तयार केली. यूथ २००० एडी लांबणीवर टाकण्यात येत आहे. कार्यक्रम लांबणीवर... जीव टांगणीवर... एकटा, अगदी एकटा... सुन्न बसून राहिलो. सगळ्यांची मेहनत मातीमोल. जीवतोड मेहनतीचे सात महिने कोसळले. बाबरी मशिदीबरोबरच राष्ट्राच्या शोकांतिकेला मिळालेली आमच्या शोकांतिकेची ही बारीक किनार. पुढील दोन दिवसात देशात हिंसक उद्रेक सुरू झाले. अंधारच अंधार... देशापुढे. सगळ्यांपुढे.. आमच्यापुढे... माझ्यापुढे..
डिसेंबरचा तिसरा आठवडा उजाडला. या आठवड्यातला माझा वाढदिवस उसनं अवसान आणून कसाबसा साजरा केला. संस्थेचे हात दगडाखाली अडकले होते. कार्यक्रमाच्या जाहिरातीवर खर्च झालेला पैसा फुकट गेला होता. ठिकठिकाणी जे ऍडव्हान्सेस दिले होते, ते परत घेण्यापेक्षा जानेवारी महिन्यात पुन्हा एकदा कार्यक्रम का घडवून आणू नये? प्रसिद्धीसाठी थोडे कमी पैसे खर्च केले तर चालेल या वेळेला. हा निर्णय होतोय तर गोदरेज सोप्सकडून पत्र आलं की पाच लाखांची स्पॉन्सरशिप आम्ही मागे घेत आहोत. पायाखालची वाळू सरकणं हा अनुभव नवा राहिला नव्हता. तरीही डोकं भणभणलच. मलबार हिलवरच्या बंगल्यावर सुनुबेनना फोन लावला. त्यांना सगळी हकीकत सांगितली. ’वुई कॅन नॉट गो बॅक ऑन अवर वर्ड.’ त्या ठामपणे म्हणाल्या. ’मला दोन दिवसानी फोन कर. मी आदीशी बोलते.’ सगळेच दिवस टेन्शनचे. त्यात पुढच्या दिवसांची फोडणी. तिस-या दिवशी सॅम बलसाराच्या सहीचं पत्र- वुई आर रिस्टोअरिंग द स्पॉन्सरशिप.
एक तिढा सुटला. इतर अनेक कायम होते. आम्ही जानेवारी महिन्याची तारीख ठरवली. स्टेडियम मिळवण्याच्या कागदपत्रांची पूर्तता केली. स्टार चॅनलकडून नवा होकार मिळवला.
... आणि मुंबईत दंगलींचा दोंब उसळला. पुन्हा एकदा सर्व पूर्वतयारी पाण्यामध्ये. प्रत्येक आपत्तीबरोबर आर्थिक खड्डा वाढत होता. दहावी-बारावीच्या परीक्षा झाल्यावर मार्चच्या अखेरीला करून टाकू या आता कार्यक्रम... असा निर्णय घेणंही यांत्रिक होऊन गेलं होतं.
मार्च महिन्यातल्या त्या शुक्रवारी मी दादरला क्लिनिकला जाण्यासाठी ठाणे स्टेशनला आलो, तर पुन्हा वेगळा सन्नाटा. मुंबईत ठिकठिकाणी बॉम्बस्फोट झाले होते. कार्यक्रम पुन्हा गचकलाच... आणि जिथे प्रॅक्टीस करायचो त्या जागेचा विध्वंस झालेला. या सगळ्या कालखंडात माझा पूर्ण रोबोट बनून गेला होता. आता कोणत्याच अनपेक्षित भावना त्या सुन्नपणाला छेदून आत जाऊ शकत नव्हत्या.
’आता सोडून द्या या अपशकुनी कार्यक्रमाचा नाद.’ एक हितचिंतक म्हणाले. हट्टी मनाने पुन्हा उचल खाल्ली. एप्रिलच्या अखेरच्या आठवड्यात कार्यक्रम करायचं ठरलं.
माझ्या कौटुंबिक जीवनाची वाताहत जाणवायला लागली होती. कुटुंबासाठी ना अवसर ना धीर. एप्रिलच्या उन्हात शिवाजी महाराजांच्या पायथ्याशी माझी पराभवगाथा मनात आकार घेत होती. प्रॅक्टीसवरचं लक्ष कमी झालं होतं. आयपीएचमधल्या कुठल्याही उपक्रमावर मी भर देऊ शकत नव्हतो. सगळीकडे निर्नायकी अवस्था होती. आजवर संस्थेच्या प्रवासात काय किंवा प्रॅक्टीसमध्ये काय, नाट्यलेखनात काय किंवा पुस्तक लिखाणात काय- हात लावला की सोनं अशी परिस्थिती होती. आपला मिडास ट्च गेलाय तरी कुठे कळेना. स्वत:च्या चुकलेल्या गणितांची जबाबदारी दुस-यांवर लोटण्याची प्रवृत्ती या वेळी माझ्यामध्ये अतिशय वरचढ होती.
प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या दिवशी प्रेक्षकांचे जथे स्टेडियमकडे येताना दिसले तशी थोडी उभारी आली. आधी पंचवीस हजार, त्यानंतर पंधरा, दहा असं होता होता (तरीही) पाच हजारांचा प्रेक्षकवर्ग जमला होता. सर्वांचं स्वागत करण्याचं माझ्या आयुष्यातलं सर्वात कृत्रिम भाषण मी केलं. स्मरणिकेचं प्रकाशन झालं. रेमो फर्नांडिसचा जादुई प्रवेश झाला रंगमंचावर. मी काही काळ पाहत राहिलो. रेमो गात होता. मला जाणवलं, मला ध्वनी लहरी जाणवताहेत, पण संगीत म्हणून नाही तर नुसते आवाज म्हणून. मी बॅकस्टेजला आलो. पुन्हा भुतासारखा फिरायला लागलो. रेमो, ज्यो, शेरॉन, रॉक मशिन... सा-यांचे कार्यक्रम पार पडले. कार्यक्रमानंतर सुन्या सुन्या झालेल्या रंगमंचावर मी गेलो. प्रखर प्रकाशानंतर आता आवराआवरीचा ’वर्किंग लाइट’ म्हणजे जवळ जवळ अंधारच होता.
प्रचंड एकटेपण झाकोळून येत होतं. स्टेडियमच्या एका कोप-यात एक गाडी थांबली. पांढरे कपडे घातलेली एक आकृती माझ्य्या बाजूने चालत आली. ते आनंद दिघे होते. ’खूप श्रम केलेत डॉक्टर... वेळ वाईट होती, तरीसुद्धा.’ आनंद दिघे तुटक बोलायचे. ’आता थोडी विश्रांती घ्या. दमलात.’ त्यांनी माझ्या खांद्यावर थोपटलं आणि ते निघून गेले.
त्या एकट्या रात्री एवढा एकच अनपेक्षित हात माझं सांत्वन करून गेला.

द सेकंड सेक्स

सेकंड सेक्स
सिमोन द बोव्हुआर
अनुवाद ; करुणा गोखले
पद्मगंधा प्रकाशन
पृष्ठे : ५५८, मूल्य : ४५०


सिमोन द बोव्हुआर - संक्षिप्त चरित्र
पुरुषात रुजवल्या जाणा-या स्वातंत्र्य, निर्णयक्षमता, तर्कनिष्ठता, आत्मविश्वास या गुणांचे सिमोनला अतोनात कौतुक होते. स्त्रीमध्ये हे गुण रुजवले जात नाहीत व त्यामुळे स्त्री दैनंदिन रहाट्गाडग्यात अडकून पडते. याउलट पुरुष मात्र रोजच्या दिनचर्येपेक्षा व शारीरधर्मापेक्षा उदात्त असे काही तरी भरीव कार्य तडीस नेऊन ’स्व"चे प्रकटीकरण साधतो हा सिमोनच्या ’सेकंड सेक्स’ मधील वारंवार प्रतिपादला जाणारा मुद्दा होता. ’सेकंड सेक्स’ प्रकाशित झाल्यानंतर स्त्री दास्याविषयीचे तिचे सिद्धांत स्त्रीविषयक भान जागृत होण्यास खूप उपयुक्त ठरले. मुलगा व मुलगी यांना वाढवण्यात केला जाणारा भेदभाव, त्याचे स्त्री व पुरुष दोघांच्याही मानसिकतेवर होणारे दूरगामी परिणाम, स्त्रीच्या मानसिक दौर्बल्यामागची तिच्यावरील कुसंस्कारांची परंपरा यांचे विस्तृत
विश्लेषण सिमोनने केल्यामुळे स्त्री समस्यांविषयी झोपी गेलेला समाज थप्पड बसून जाग यावी त्याप्रमाणे खडबडून जागा झाला. ’सेकंड सेक्स’ वाचून अनेक स्त्रियांना स्वत:च्या दुय्यमपणाची कारणे कळली. अनेक आयांना मुली वाढवताना काय टाळले पाहिजे याचे भान आले. तरुण मुलींना स्वत:च्या शरीराची, पर्यायाने स्त्रीत्वाची लाज वाटणे बंद होऊन ताठ मानेने आयुष्याला सामोरे जाण्याचा आत्मविश्वास आला. थोडक्यात, सिमोनच्या पुस्तकाने स्त्रियांची एक संपूर्ण पिढीच स्वत:कडे अधिक डोळसपणे बघून स्वत:शी संवाद साधू लागली. या पुस्तकाने स्त्रीच्या मानसिकतेत आमूलाग्र क्रांती केली. त्याचा फायदा व्यक्तिगत पातळीवर स्त्रियांना झालाच, पण पुढच्या पिढीतील मुलीचं संगोपन अधिक जाणीवपूर्वक करण्यासाठी, त्यांना माणूसपण देण्यासाठी सुजाण मातांची एक फळीच या पुस्तकाने तयार केली. ’स्त्री जन्मत नाही, तर घडवली जाते’, या सिमोनच्या गाजलेल्या विधानाचे दूरगामी परिणाम लक्षात घेऊन अनेक स्त्रियांनी आपल्या मुली चुकीच्या पद्धतीने घडू नयेत याची खबरदारी घेतली.

’सेकंड सेक्स’ या पुस्तकावर विचार विनिमय करण्यास तिने १९४६ मध्ये सुरुवात केली. त्या वेळेला स्त्रीवादी साहित्य ही कल्पनाही अस्तित्वात नव्हती. 'Vindication of Rights of Women' यासारख्या पुस्तकांचे लेखन झाले असले तरी स्त्रीविषयक अभ्यासग्रंथ तर अजिबात अस्तित्वात नव्हते. स्त्रियांच्या सामाजिक व आर्थिक दृष्टीकोनातून विचार करणारे तत्वचिंतक म्हणजे जॉन स्टुअर्ट मिल, मार्क्स व एंगल्स. विशेषत: मिलचे 'Subjections of Women' (1869), एंगल्सचे Origin of the Family, Private Property and the State (1888), व एलिस हॅवलॉकचे लैंगिक संदर्भात विश्लेषण करणारे Man and Women (1894) ही ख-या अर्थाने स्त्री विषयाचा ऊहापोह करणारी प्रसिद्ध पुस्तके होत. एकोणिसाव्या व विसाव्या शतकात स्त्रियांच्या हक्कांविषयी ज्या चळवळी झाल्या, त्या मुख्यत्वेकरून वाढत्या औद्योगिकरणाशी संबंधित होत्या. समान कामासाठी समान वेतन, कामाचे तास १२ न ठेवता १०, कामाच्या जागा आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित करणे, बाळंतपणाची व आजारपणाची रजा यांसारख्या स्त्रीच्या अर्थार्जनाशी निगडित मागण्या घेऊन चळवळी होत होत्या. स्त्रियांच्या लढण्याचा दुसरा मुद्दा होता मतदानाच्या हक्काचा.

’सेकंड सेक्स’ मध्ये सिमोनने स्त्रीचा अगदी कृषीसंस्कृतीच्या उगमापासून ते फ्रेंच राज्यक्रांतीचा काळ व तेथून पुन्हा आधुनिक काळापर्यंतचा जो राजकीय व सामाजिक इतिहास विस्तृतपणे नोंदला आहे. स्त्रीच्या सामाजिक दर्जाची एवढी सखोल कारणमीमांसा याआधी कोणीही केली नव्हती. सिमोनच्या पुस्तकाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तिने स्त्रीची मानसिक जडणघडण, तिच्यावरील कौटुंबिक व धार्मिक संस्कार, बालपणापासून तिच्यात निर्माण केली जाणारी परावलंबित्वाची, असहायतेची भावना, तिच्या शारीरिक सौंदर्याला दिले जाणारे अवास्तव महत्व, आणि त्याच वेळी तिच्या शारीरिक क्षमतांकडे केले जाणारे दुर्लक्ष, तिच्या बौद्धिक विकासाचा उपहास करून तिची तिच्या लैंगिक देहधर्मात केलेली स्थानबद्धता याचा सविस्तर उहापोह केला. त्यातून सिमोनने सप्रमाण दाखवून दिले की स्त्री निसर्गत: अबला नसते, तर ती बनवली जाते. स्त्री व पुरुषांमधील नैसर्गिक घटकांना अवास्तव प्रमाणत भडक करून त्यांच्या मानसिक व शारीरिक क्षमतांमध्ये व पर्यायाने त्यांच्या सामाजिक स्तरांमध्ये जी खोल दरी निर्माण केली जाते, ती निसर्गसुलभ नसून मानवनिर्मित आहे. या संदर्भात तिने केलेले ’स्त्री जन्मत नाही, तर घडवली जाते’ हे वाक्य अजरामर झाले.