नर्मदा परिक्रमा : एक अंतर्यात्रा
भारती ठाकूर
गौतमी प्रकाशन, पृष्ठे : २६२, मूल्य : २०० रूपये
स्वामी कृष्णस्वरूपानंद नावाच्या संन्यासाशी एक दिवस विवेकानंद केंद्रात ऒळख झाली. ते उत्तर काशीहून आले होते. आणि भारत भ्रमणासाठी निघाले होते. मराठीत बोलत होते म्हणून जरा अधिक आपलेपणा वाटला. त्यांना ग्रंथालय दाखविण्याची जबाबदारी मी स्वत:वर घेतली. स्वामीजींशी बोलताना जाणवलं, त्यांचं वाचन प्रचंड असावं. त्यांच्या बोलण्यातून विचारांची स्पष्टता जाणवत होती. त्या दिवशी संध्याकाळी मी समुद्र किना-यावर बसून विवेकानंद शिला स्मारकाकडे बघत होते. मनात रामकृष्ण परमहंस आणि विवेकानंदांबद्दलचे विचार चालू होते. तेवढ्यात स्वामी कृष्णस्वरूपानंद तिथे आले.
"नमस्कार स्वामीजी", मी त्यांना अभिवादन केले.
"एवढ्या कुठल्या गहन विचारात हरवली आहेस बेटा?" स्वामीजींनी आपुलकीनं विचारलं. इतके दिवस मनात खदखदणा-या प्रश्नांची उत्तरे स्वामीजी देऊ शकतील असा विश्वास वाटला.
"स्वामीजी, काही शंका - प्रश्न मनात आहेत. कन्याकुमारीला आल्यापासून अनेक क्षेत्रातल्या माणसांच्या गाठीभेटी होत असतात. भोळे भाबडे, अशिक्षित, पण देवावर पूर्ण भरोसा ठेवून जगणारे, साधू-संन्यासी, विद्वान-अभ्यासू, बुद्धीवादी माणसं तर कधी उच्चशिक्षित असूनही गुरूंच्या मागे लागणारे, बुवाबाजीच्या आहारी गेलेले असे अनेक लोक या ठिकाणी येत असतात. रामकृष्ण-विवेकानंदांसारखे गुरू-शिष्य विरळाच. "आजकालचे गुरू आणि त्यांचे आश्रम म्हणजे संस्थानं आणि सत्ताकेंद्र झाली आहेत. रामकृष्ण-विवेकानंदांसारखे नि:स्पृह- ज्ञानी गुरू-शिष्य आजच्या जगातही आढळतात का? आध्यात्मिक गुरूशिवाय ज्ञानप्राप्ती होतच नाही का? मंत्रांचं एवढं अवडंबर का माजवलं जातय? मंत्रांमध्ये खरच एवढी शक्ती असते का? "
स्वामीजी हसले. म्हणाले, " मला वाटलं इथं बसून तू घरचा, नातेवाईकांचा आणि मित्रमैत्रिणींचा विचार करते आहेस. पण तुझ्या डोक्यात वेगळ्याच विचारांचा दंगा चालला आहे. असे विचार तुझ्या डोक्यात येताहेत ही चांगली गोष्ट आहे. तुझा पहिला प्रश्न रामकृष्ण-विवेकानंदांसारखे गुरू-शिष्य आजकाल आहेत का? त्याचं उत्तर होकारार्थीच आहे. त्यांच्या समाजोपयोगी कार्याच्या पध्द्ती वेगळ्या असतील, पण ज्ञान, वैराग्य आणि नि:स्पृहतेच्या बाबतीत ते कुठंही कमी नाहीत. बुवाबाजी, भोंदुगिरी याबद्दल तुला जो संताप होतोय, वाईट वाटतय, ते अगदी स्वाभाविक आहे. असे लोक म्हणजे समाजाला लागलेली कीड आहे. त्यासाठी समाजामध्येच जागृती व्हायला हवी. खरी धर्मग्लानी तर हे बुवाबाजी करणारे लोकच समाजाला आणतात. तुमच्यासारख्या तरूण पिढीनं यासाठी समाजप्रबोधन करायला हवं. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातला फरक समजावून सांगायला हवा.
"स्वामीजी, अंधश्रद्धा ठाऊक आहे, पण श्रद्धा म्हणजे नेमकं काय?"
"चांगला प्रश्न विचारलास. श्रद्धा म्हणजे काय? तर "सत्ये प्रतिष्ठिता धारणा सा श्रद्धा" ! सत्य काय आहे, हे जाणून घेऊन आचरण करणे म्हणजे श्रद्धा. आध्यात्मिकच नाही तर प्रत्येकच क्षेत्रात गुरूची आवश्यकता असते. लहान मूल मुळाक्षरं शिकतं तेव्हा त्याचे गुरूजी या बालकाचा हात स्वत:च्या हातात धरून ती अक्षरं गिरवतात. थोडा मोठा झाला की त्याला गणिताची सूत्र शिकवतात. पण याचा अर्थ असा नाही की एम.ए. चा पेपर लिहितानाही ते त्याचा हात हातात धरून पेपर लिहितील, किंवा आयुष्यभर त्याची गणितं सोडवून देतील. आपल्या शिष्याचं ज्ञान आतून उमलून येईल, हे पाहाणं गुरूचं काम. गरज भासेल तेव्हा त्यानं मार्गदर्शन करावं. रामकृष्णांनी विवेकानंदांच्या आयुष्यात केला का काही हस्तक्षेप? हस्तक्षेप न करताही त्यांनी परिपूर्ण शिष्य घडवला. सतत गुरूच्या मार्गदर्शनानं अथवा आदेशाप्रमाणे जगायचं ठरवलं तर मग शिष्याची अंत:शक्ती वाढणार कधी? त्यामुळे तुझा दुसरा प्रश्न -आध्यात्मिक गुरूची गरज आहे का? याचं उत्तर हेच की गरज आहे. पण मार्गदर्शन करणं एवढीच गुरूची जबाबदारी. कायमच शिष्याचं बोट धरून ठेवणं योग्य नाही. गुरूनं मार्ग दाखविला की मार्गक्रमण करणं शिष्याची जबाबदारी.
तुझा तिसरा प्रश्न मंत्रशक्तीबद्दलचा आहे. मुळात मंत्र या शब्दाचा अर्थ काय? मननात त्रायते इती मंत्र:. ज्याच्या मनन-विचारांनी आपण तारले जातो तो मंत्र. तारले जाणं याचा शब्दश: अर्थ घेऊ नकोस. मला म्हणायचं आहे ते अशा अर्थानं की ज्यामुळे तुमचे विचार प्रगल्भ होतात, आयुष्याचा अर्थ उमगू लागतो, जाणिवांचा स्तर उंचावू लागतो, असं काही. मंत्राचे उच्चार किंवा नामस्मरण, जप हेसुद्धा शास्त्र आहे. आपण मोठमोठ्याने आरडाओरडा केला तर आपल्या छातीत धडधडायला लागतं. शरीर थरथर कापतं. ओठ, जीभ कोरडी पडते. या उलट शांत स्वरातलं गाणं गुणगुणलं ऐकलं की आपल्याला स्वत:लाच शांत वाटतं. शरीर, मनावरचे ताण दूर होतात. तेच काम मंत्रांचं असतं. त्यांच्या उच्चारांमुळे रक्ताभिसरणावर परिणाम होतो. विशेष करून बीजमंत्राचा, म्हणजे ज्यात -हीं, क्लीं असे शब्द आहेत. त्यांच्या उच्चारणामध्ये नादाची स्पंदनं अधिक आहेत. त्यांची वारंवारता आणि सामर्थ्य (Frequency and Potency)अधिक आहे. अशा मंत्रामुळे शक्ती संचार फार लवकर होतो. त्यात गुरूंनी सिद्ध करून तो मंत्र तुम्हाला दिला असेल तर दुधात साखर. नादाच्या स्पंदनाचं एक स्वत:चं शास्त्र असतं. नामजप अथवा मंत्रजप करताना नादस्पंदनाची वलयं आपल्याभोवती निर्माण होतात. वातावरणाची शुद्धी करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. आजकाल गायत्री मंत्राचा शेतात अधिक धान्य यावं म्हणून उपयोग करतात, हे तुला ठाऊक आहे का? अशा मंत्र जपामुळे सिध्दी फार लवकर प्राप्त होतात. अनुभूती येतात पण सिध्दी किंवा अनुभूती हे साधकांचं ध्येय कधीच नसावं. मंत्र, जप, नामजप हे एक शास्त्र आहे. नादाचं शास्त्र. त्यावर बरीच काही पुस्तकं उपलब्ध आहेत. मिळाला कधी वेळ तर नक्कीच अभ्यास कर. मंत्र शास्त्र काही थोतांड नाही. आपल्या ऋषी मुनींनी भरपूर अभ्यास आणि चिंतन करून मंत्रांची निर्मिती केलीय."
No comments:
Post a Comment