Friday 14 May 2010

मी बॅरिस्टरचं कार्ट बोलतोय!

मी बॅरिस्टरचं कार्ट बोलतोय!

डॉ. हिम्मतराव साळुबा बावस्कर

मॅजेस्टिक प्रकाशन, पृष्ठे : १०६, मूल्य : १०० रुपये



बिनडोक, अडाणी व दरिद्री शेतक-याच्या पोटी मी जन्मलो। शेतक-याच्या जीवनाशी निगडित असलेली जीवघेणी संकटे पाहिली, सोसली। विंचूदंश, सर्पदंशावर संशोधन केले। हे करत असताना नकळतपणे संसाराकडे दुर्लक्ष झाले. चंगळवादाचा अनुभव नाही. त्यामुळे ईश्वरचरणी एकच प्रार्थना की पुनर्जन्म मिळाल्यास तो मंत्र्याच्या पोटी व्हावा; म्हणजे कलियुगातील सा-या सोयी अनुभवण्यास मिळतील. भारत हा कृषीप्रधान देश केव्हा होईल, व या भारतात सोन्याचा दिवस तो असेल की ज्या दिवशी शेतक-याच्या घरावर इन्कमटॅक्स अधिका-यांच्या धाडीत हजारो रुपयांची रोकड मिळेल.

वैद्यकीय शिक्षण हे गरिबाच्या आवाक्याच्या बाहेर गेले आहे. एका वैद्यकीय महाविद्यालयात मुलाला प्रवेश घेण्यासाठी गेलो असता वीस लाख भरा असे सांगितले गेले. मी केलेले संशोधन न ऐकल्यासारखे. जेथे महात्मा गांधीही त्यांचा मुलगा घेऊन गेल्यास पैसेच लागतील. अशाच एका वैद्यकीय कॉलेजातील प्राध्यापकाला विचारले की, अमाप देणगी देऊन तयार झालेला डॉक्टर गरीबांना सेवा देईल काय? त्यावर त्यांचे ( न पटण्यासारखे) उत्तर असे की ही मुले जन्मत:च श्रीमंताची आहेत. त्यामुळे त्यांच्यापुढे पैसा कमावणे हा हेतू नसतो. खरोखर, असे घडले तर महात्मा गांधीजींचे स्वप्न खरे ठरेल. कारण आतापर्यंतच्या माझ्या अनुभवास वैद्यकीय अधिकारी, जो गरिबीत जन्मला असूनही नोकरीमध्ये विनामूल्य वैद्यकीय सेवा देणारा क्वचितच. आजच्या जमान्यात वैद्यकीय पेशा हा एक बदनाम झालेला पेशा आहे. याचे कारण अज्ञानाद्वारे नकळत निरनिराळ्या तपासण्या करणे, अमाप पैसा वसूल करणे. सरकारी दवाखाने तर गुरांचे गोठे झाले आहेत. जोपर्यंत मंत्री किंवा त्यांचे नातेवाईक प्राथमिक आरोग्य केंद्रात फाटलेल्या, डाग पडलेल्या चादरीवर, घाणीचे साम्राज्य असलेल्या ठिकाणी भरती होऊन व न ऐकलेले शब्द तेथील कर्मचा-यांच्या कृपेने त्यांच्या कानी येतील, प्रत्येक वस्तू पदरमोड करून आणावी लागते हे त्यांना कळेल, तेव्हाच आरोग्य खाते सुधारेल. अन्यथा सर्व व्यर्थ आहे. नुकतेच मराठवाडा व विदर्भामध्ये हजारो लोकांना चिकनगुनियाची बिमारी झाली. हे एक संकट समजून त्यावर वैद्यकीय मंडळींनी मात करायला हवी होती. परंतु घडले ते उलटेच. काही वैद्यकीय अधिका-यांनी एक ते दोन महिन्यांच्या रजा काढून सरकारी दवाखान्याच्या शेजारी आपले खाजगी दवाखाने थाटले व हजारो रुपये मिळवले.
सर्पदंश म्हणजे कुटुंबावर येणारे एक धर्मसंकटच होय. त्याकरता सर्पदंशाच्या आणि विंचूदंशाच्या रूग्णावर सरकारी रूग्णालयात इलाज होणे महत्वाचे आहे. कारण हा गरीब शेतक-याचा जीवघेणा प्रश्न आहे. सर्पदंशावरील प्रतिलसेसाठी ४५० रुपये लागतात. एखाद्या वेळेस २०-२५ बाटल्या द्याव्या लागतात. ही प्रतिलस सरकारी दवाखान्यात विनामूल्य मिळते. म्हणून आजपर्यंतचे सर्व रूग्ण सरकारी दवाखान्यात नेऊन मी त्यांच्यावर इलाज करतो व करीत आहे. तेथे माझी सेवाही मी विनामूल्य देतो. महाराष्ट्रात आजही घोणस, मणेर व नागदंशाचे ३० टक्के रूग्ण मृत्यू पावतात. याला कारण म्हणजे वेळेवर प्राथमिक आरोग्य केंद्रात हजर नसलेले वैद्यकीय अधिकारी. तसेच प्रतिलस न देणे अथवा उपलब्ध नसणे. मी सतत दहा वर्षे वारंवार शासनास पत्रे लिहून प्रथमिक आरोग्य केंद्रास कृत्रिम श्वासोछ्वास देण्यासाठी ऍम्बू बॅग व इतर साहित्य उपलब्ध करावे अशी विनंती करत आहे. परंतु अद्याप यश आलेले नाही. ग्रामीण भागात व्हेंटीलेटर दिल्यास ते विनामूल्य वापरून दरवर्षी अहवाल पाठवीन अशी मी लेखी विनंती करूनही मुंबईच्या एका श्रीमंत देवालयाने नाकारली; परंतु माझ्या दोन मित्रांना मात्र त्यांची मंत्र्यांशी जवळीक असल्यामुळे याच देवालयाने करोडो रुपयांची यंत्रसामग्री दिली.
२१ सप्टेंबर, २००६ रोजी एका डॉक्टर मित्राचा दूरध्वनी आला व रात्री नऊ वर्षांची एक मुलगी सर्पदंशाने दगावली. सर्व माहिती विचारली असता, या मुलीला नाग या सर्पाने दंश केला होता व तिला श्वासोछ्वास घेण्यास त्रास होत होता. श्वसन नलिकेत टाकण्यासाठी असलेली नळी व इतर सामुग्रीचा ट्रे रोजच्या ठिकाणी नव्हता. म्हणून डॉक्टर स्वत: तो शोधण्यासाठी अपघाती विभागात पळत गेला, पण तेथेही नव्हता. दरम्यानच्या काळात ती मुलगी दगावली. नंतर शोध लावला असता ही जीवदान देणारी सामुग्री एक मंत्रीमहोदय त्या भागात दौ-यावर असताना त्यांच्या आरोग्याची काळजी घेणा-या ऍम्ब्युलन्समध्ये गेली होती. धन्य ती लोकशाही आणि धन्य ते आरोग्य खाते!

No comments:

Post a Comment