Friday 14 May 2010

निसर्गोत्सव

निसर्गोत्सव


दुर्गा भागवत


दिलीप प्रकाशन, पृष्ठे : १२८, मूल्य : ७५ रुपये


ही गोष्ट जातक कथातली आहे. गौतम बुध्दाने आपल्या मागच्या जन्मातल्या ज्या कथा आपल्या शिष्यांना सांगितल्या त्यांना जातक कथा म्हणतात. मागच्या जन्मातल्या बुध्दाला बोधिसत्व म्हणतात. सर्व त-हेचा चांगुलपणा, सर्व त-हेचे कौशल्य बोधिसत्वात असे. कधी हा बोधिसत्व माणूस असे, तर कधी पक्षी असे. आता ही जी गोष्ट मी सांगणार आहे त्या गोष्टीत बोधिसत्व होता रानातल्या झाडावरचा देव. हे रान शाल नावाच्या झाडाचे. हे झाड फार मोठे व सुंदर असते. त्याची पाने मोठी व फुले नाजूक असतात. भारतातले हे एक फार जुने झाड आहे. गौतम बुध्दाचा जन्म शालाच्या झाडाखालीच झाला.
असे हे शालाचे झाड. अगदी गर्द रानातले. ते बागेत वाढत नाही. शालाच्या झाडाला एकटे दुकटे राहायला आवडत नाही. शालाचे रान वेगळेच असते नि त्यात झाडांची गर्दी असते. त्यांच्या फांद्या एकमेकीत गुंतून राहिलेल्या असतात. एकमेकांच्या गळ्यात टाकून ही झाडं मजेत हालत असतात.

अशा या झाडांचे एक गर्द रान हिमालयात होतं. त्यात बोधिसत्व एका झाडाच देव होता. त्यावेळी काय झाले, वैश्रवण-कुबेर यक्ष स्वर्गात राहत होता. देवलोकातला सारा कारभार तो पाहत होता. एकदा त्याच्या हातून एक अपराध घडला नि त्याला देवलोक सोडावा लागला. त्या वेळी इंद्राने दुस-या एका कुबेराची नेमणूक केली. या नव्या वैश्रवणाने सा-या यक्षांना देवांना असा आदेश दिला की तुम्हाला तुमच्या जागेचा कंटाळा आला असेल तर ती जागा सोडून तुम्हाला आवडेल अशा जागी तुम्ही जाऊन राहावे.

हे ऐकून हिमालयातल्या झाडावरच्या देवांना, वृक्षदेवांना फार आनंद झाला. त्यांचे रान काळोखे होते. या देवांना माणासाच्या वस्तीजवळ जावे असे वाटत असे. तिथे झाडे एकमेकांपासून लांब होती. उन्हात न्हात होती. वा-यात हवी तशी डुलत होती. तेव्हा पुष्कळशा देवांनी ठरवले की हे एकांत, काळोखे थंडगार जंगल सोडून आपण गावाजवळच्या झाडांवर जाऊन राहावं. ते जायला निघाले तरी बोधिसत्व स्वस्थ बसून होता. तो म्हणाला, मी येणार नाही. तुम्हीही हे शालवन सोडून दूर जाऊ नका. थोडीशीच जागापालट करा. पण त्याचे न ऐकता देव निघून गेले.

एकदा काय झाले, मोठी वावटळ उठली. वारा जोरात वाहू लागला. त्याच्या सोसाट्यामुळे मोठमोठाले वृक्ष उपटले गेले. जुने वृक्ष पडले. मोठमोठ्या फांद्यांचा विस्तार असलेले दांडगे वृक्षदेखील उन्मळून पडले. पण या शालवनातला मात्र एकही वृक्ष पडला नाही. कारण तिथे सारी झाडे एकमेकांत फांद्या गुंफून एकमेकांना आधार देतच वाढली होती. माणसाच्या वस्तीजवळ असलेल्या देवदेवता, त्यांची घरे मोडल्यामुळे आता बेघर झाल्या होत्या. पोराबाळांना कडेवर घेऊन आसरा शोधत होत्या. या सा-या देवदेवता हिमालयातल्या शालवनात परत आल्या नि आपली कर्मकथा तिथे जे देव नि देवता होत्या त्यांना ऐकवू लागल्या. त्या देवदेवतांनी त्यांची ही कथा बोधिसत्वाला सांगितली. बोधिसत्व म्हणाला, शहाण्याचं बोलणं न ऐकता निघून गेलेल्यांची अशीच गत व्हायची. रानात राहणारी जात माणसाची असो की वृक्षाची, त्या जातीनं एकत्र वस्ती करूनच राहाणं श्रेयस्कर असतं. एकेकटं झाड मोठं असलं तरी वारा उखडून टाकतो. आमची झाडं रानटी असली तरी दाट आहेत, म्हणून ती वाचली. बाकीचे प्रचंड वृक्ष एकेकटे असल्यामुळे मोडून पडले.

No comments:

Post a Comment