Friday 14 May 2010

निसर्गायण

निसर्गायण

दिलीप कुलकर्णी

राजहंस प्रकाशन, पाने: १९६, मूल्य : १४० रूपये

आपल्या सदिछ्चांचा वनस्पतींवर किती परिणाम होतो याचं अंगावर रोमांच उभं करणारं एक उदाहरण- आय बी एम या जगप्रसिध्द उद्योगात काम करणार्‍या फ़ोगेलनं संमोहनाचे काही प्रयोग केले होते. आणि त्या शास्त्रातही अशा भावनांची गरज असते हे त्याला ठाऊक होतं. एका वेगळ्याच प्रकारची मानसिक शक्ती अशा बाबतीत आवश्यक असते हे तो जाणत होता. या शक्तीचा प्रत्यय थोडीफ़ार आध्यात्मिक साधना केलेल्या त्याच्या व्हिव्हियन विले या मैत्रिणीनं त्याला आणून दिला. घरामागच्या बागेतल्या साक्सिफ़्रेजची दोन पानं तिनं खुडली. पैकी एक पान तिनं बैठकीच्या खोलीतल्या टेबलावर ठेवलं आणि दुसरं आपल्या उशाजवळच्या टेबलवर. रोज सकाळी उठल्यावर टेबलावरच्या पानाकडे सौहार्दपूर्ण नजरेनं पाही आणि मनोमन प्रार्थनापूर्वक अशी इछ्चा करी की ते पान ताजं, टवटवीत जिवंतच राहावं. बैठकीच्या खोलीतल्या पानाकडे मात्र तिनं पूर्ण दुर्लक्ष केलं. महिन्याभरानंतर तिनं फ़ोगेलला घरी बोलावलं. अन तेव्हा जे पाहिलं त्यामुळे फ़ोगेलचा स्वत:वर विश्वासच बसेना. बाहेरच्या खोलीतलं पान सुकलं होतं. काळं- करडं झालं होतं. पण उशाशी ठेवलेलं पान मात्र अजून हिरवं, सतेज, टवटवीत जणू आताच खुडून आणलं आहे असं होतं. आपल्यालाही असं जमेल का हे पाहायला फ़ोगेलनं आय बी एमच्या प्रयोगशाळेच्या इमारतीबाहेर असणार्‍या एल्मची तीन पानं खुडून आपल्या उशाजवळच्या टेबलावरच्या काचेवर ठेवली. रोज न्याहारी करण्यापूर्वी तो दोन बाजूच्या दोन पानांवर चित्ताची एकाग्रता करून ती जिवंत राहावीत अशी उत्कट इछ्चा व्यक्त करी. मधलं पान मात्र हेतुत: दुर्लक्षी. आठवड्याभरानंतर बाजूची पानं ताजी, सतेज, जिवंत होती. मधलं पान मात्र चुरगळून वाळलं होतं.वनस्पती जर इतक्या संवेदनक्षम असतील तर त्या तोडल्यामुळे त्यांना दु:ख होत नाही का, असा प्रश्न साहजिकच कोणाच्याही मनात येईल. वनस्पतींना दु:ख तर निश्चितच होतं. पण त्यामागे दोन गोष्टी आहेत. एक म्हणजे तोडलेला भाग पुन्हा फ़ुटू शकतो. वनस्पती, झाडं यांचं हे वैशिष्ट्य आहे. अन दुसरा भाग असा की "कशासाठी" तोडलं यावर दु:ख बरच अवलंबून आहे. जर दुसर्‍या जीवाला या तोडीमुळे खूप लाभ होणार असेल तर झाडांना तितकंसं दु:ख होणार नाही. रक्त हा मानवी शरीरातला अत्यंत आवश्यक पदार्थ. पण दुसर्‍या एखाद्याला त्याचा उपयोग होणार असेल तर, आपणही रक्तदान करून त्यातला काही भाग आनंदानं दुसर्‍याला देतोच. झाडांमध्येही ही भावना असतेच. संपूर्ण झाड तोदलं तरी एखाद्या वेळी चालेल, फ़क्त अशा वेळी झाड तोडण्याचं कारण योग्य हवं. कुणाचं तरी अन्न त्यामुळे शिजणार असेल, वा कुणाला निवारा मिळणार असेल तर झाड तोडायला हरकत नाही. देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी क्रांतिकारक जसं स्वसंमतीनं आनंदानं प्राणार्पण करतो, तसंच झाडंही करतील. फ़क्त तोडलेल्या झाडाचा, वनस्पतीचा त्या बलीदानाला साजेसा उपयोग करण्याचं दायित्व आपल्यावर आहे.

No comments:

Post a Comment