Monday 23 August 2010

मास्तरांची सावली

मास्तरांची सावली : कृष्णाबाई नारायण सुर्वे

डिंपल प्रकाशन,पृष्ठे - १८४, मूल्य - १८० रुपये

सांताक्रूझला बाबुरावाच्या झोपड्यात असताना माझ्याकडे भांडीकुंडी काहीच नव्हती. मास्तर बाहेर गेले की मी चूल पेटवायला काटक्या, कागद गोळा करायची. चुलीवर तीन भाक-या थापायच्या आणि त्या कागदावर काढून ठेवायच्या. एखाद्या दगडावर मिरच्यांचा ठेचा नाहीतर खर्डा वाटून तो भाकरीवर ठेवायची. एक भाकरी मला, दोन मास्तरांसाठी. कित्येक दिवस हेच जेवण होतं आमचं. पण त्यालाही चव असायची. कारण ती प्रेमाचीच चटणी आणि प्रेमाचीच भाकर होती ना! याच झोपड्यात आम्ही एका भयंकर वादळाचा सामना केला होता. ते वादळ आठवलं की अजूनही अंगावर शहारे येतात.

साल आठवत नाही मला. पण त्या वर्षी भयंकर पाऊस पडला होता. प्रचंड वादळ झालं होतं. आधीच आम्ही पार कंगाल झालो होतो. त्यात झोपडीसकट सगळंच वाहून गेलं होतं. फक्त आमच्या अंगावरचे कपडे तेवढे शाबूत राहिले होते. लग्नाला जेमतेम वर्ष झालं होतं. कुसुम रणदिवेंच्या कृपेनं मला मूलबाळ काही तेव्हा झालं नव्हतं म्हणून बरं. नाहीतर आम्ही काय केलं असतं? या विचारानेच आजही अंगावर काटा येतो. तर त्या वादळी पावसातून कशीबशी वाट काढत, एकमेकांना घट्ट धरून, बिलगून आम्ही चाललो होतो. दूरवर एक मशीद दिसत होती. तिथे तरी पोचावं असा विचार मनात चालला होता. पाणी माझ्य कमरेच्या वर पोचलं होतं. मास्तर माझ्यापेक्षा उंच असल्यामुळे त्यांन तितकीशी भीती वाटत नव्हती. पण मी पडले खुजी. तशी मी सर्वच बाबतीत त्यांच्यापेक्षा खुजीच आहे म्हणा. असो. तर त्या पाण्यातून चालताना खाली खड्डा आहे का विहीर काहीच कळत नव्हतं. माझे पाय खाली खेचल्यासारखे होत होते. कुठे वळावं मागे की पुढे? काहीच कळेना. तिथे जवळ्पास मोठमोठी झाडं होती. त्या झाडांवर म्हणे तडीपार केलेले, हद्दपार केलेले लोक बसायचे आणि रात्री चो-या करायला, मारामा-या करायला बाहेर पडायचे. त्यांनी आम्हाला झाडावरून पाहिलं आणि एकदम ओरडले, ’ओ ताई, दादा थांबा तिथंच. पुढे येऊ नका. इकडे खूप पाणी आहे आणि त्या बाजूला तर पूर आलाय.’ असं म्हणून पटापट झाडावरून त्यांनी उड्या घेतल्या. मी क्षणभर घाबरलेच. मनात आलं, आपल्याला घेऊन तर जाणार नाहीत ना? किंवा ही कुणी पाठवलेली माणसं तर नसतील ना! मास्तर म्हणाले, ’किशा, घाबरू नकोस. बघू तर खरं काय करतात ते!’ ती माणसं जवळ आली तसे मास्तर त्यांना विनवू लागले, ’दादा, आम्ही पाया पडतो तुमच्या. इथलं आम्हाला काहीच माहीत नाहीये. एखाद्या सुरक्षित ठिकाणी आम्हाला घेऊन चलता का?’ त्यांनी आम्हाला मशिदीत अगदी सुरक्षितपणे पोचवलं.

मशिदीत आम्हाला आसरा मिळाला खरा, पण आम्ही पार भिजून गेलो होतो. मास्तरांना तर हळूहळू ताप चढायला लागला. मला मात्र काहीच झालं नव्हतं. मशिदीतले लाईटही गेले होते. नुसता अंधार पसरला होता. आधीच उपाशी तापाशी, त्यात हाताशी काही नाही. जे काही होतं नव्ह्तं तेही वाहून गेलं होतं. काय करावं काहीच सुचत नव्हतं. रात्र झाली. मास्तरांचा ताप अधिकच वाढला. त्यांना थंडी वाजू लागली. अगदी थाडथाड उडत होते. मी तर घाबरलेच होते. मशिदीत सगळे मुसलमान होते. त्यांच्यातला एक मौलवी बाबा पेल्यात पाणी घ्यायचा, काहीतरी मंत्र पुटपुटायचा आणि मास्तरांच्या तोंडात विभूती टाकून ते मंतरलेलं पाणी ह्यांना प्यायला द्यायचा. मला ते पटत नव्हतं. विभूती टाकून का कुणी बरं होतं? पण मी काय बोलणार तेव्हा? तो बाबा आपला अला के नामसे’, ’खुदा के नामसे’, ’उसके नामसेम्हणून सारखा यांच्या तोंडात विभूती टाकयचा. मला भीतीच वाटत होती. मनात यायचं, हा माणूस बहुधा ही विभूती खाऊन खाऊनच खलास होणार. शेवटी न राहवून मी त्या बाबाला विचारलं, ’तुम्ही यांच्या तोंडात सारखी सारखी ही विभूती का टाकता?’ तसा तो म्हणाला, ’बहेन, इसको विभूती मत बोलो. ये खुदाका प्रशाद है. ये खाके तुम्हारा जल्दी अच्छा हो जायेगा, चिंता मत करो.’ मी मनातून खचूनच गेले होते, पण परस्वाधीन असल्यामुळे काही बोलता येत नव्हतं.पावसापाण्यातून, अशा अवस्थेत मास्तरांना कुठे घेऊन जाणार होते? शेवटी तिस-या दिवशी पाऊसही उतरला आणि मास्तरांचा तापही. इकडॆ तिकडॆ बघायला लागले, मला खूप बरं वाटलं. मनातून मी त्या बाबाचे आभार मानले. मास्तर हळू आवाजात विचारत होते, ’किशा, कुठे आहोत ग आपण?’ ते तसे ग्लानीतच होते. त्यांना काही आठवत नव्ह्तं. चेहरा अगदी कसानुसा झाला होता. मी बाबांना म्हटलं, ’यांना खूप भूक लागलीय. तीन दिवस पोटात काहीच नाहीये. काही खायला मिळेला का?’ मग मशिदीतल्या माणसांनी रोटी आणि थोडीशी चटणी आणून दिली. मास्तरांनी ती खाल्ल्यावर त्यांना थोडी तरतरी आली. ’भुकेला कोंडा आणि नीजेला धोंडाम्हणतात तसं झालं होतं. जरा भानावर आल्यावर मास्तर म्हणाले, ’किशा, काय खालं असेल ग आपल्या घराचं?’

मी म्हटलं, ’मरू दे ते घर. जाऊ दे. तुम्ही ठीक झालात ना, यातच मला आनंद आहे. घर काय पुन्हा बघू कुठेतरी.’ असं म्हणून मी त्यांना घेऊन मशिदीबाहेर पडले. पुन्हा एकदा उघड्यावरचा संसार नशिबी येतोय का काय असं वाटत होतं. पुन्हा एकदा नव्या घराचा प्रश्न या वादळाने उभा केला होता.

No comments:

Post a Comment