Monday 23 August 2010

धाकट्या नजरेतून

धाकट्या नजरेतून : अलका गोडे
राजहंस प्रकाशन
पृष्ठे - १५५, मूल्य - २०० रुपये

दिलीपच्या छोट्या मोठ्या नोक-या चालू असतानाच ’डोंगरे बालामृत’मधली नोकरी चक्क आफ्रिकेलाच चला म्हणत होती. दिलीप आता महत्वाच्या टप्प्यावर उभा होता. एका बाजूला घरातलीच ध्येयवेडी माणसं सामाजिक बांधिलकीला अनुसरून एका निष्ठेभोवती फिरत होती. अनेक बाबींमधला तोकडेपणा, पण जोडीला कमालीची जिद्द या दोहोंमधला मेळ महत्प्रयासानं सांभाळत होती. या प्रवासात त्यांची झालेली मानसिक, आर्थिक कुचंबणा, लहान लहान स्वप्नांची गळचेपी, न पेलणारं नुकसान, सगळंच दिलीपला पचायला जड जात होतं. या सगळ्यात स्थैर्य आणि सुरक्षितता यासाठी लागणारी महत्वाची आर्थिक बाजू पा-याप्रमाणे चंचल राहणार होती. रस्ते खडबडीत वाटत होते. अशा वेळी त्याची मानसिकता कशी काम करत होती, मला माहीत नाही. या पार्श्वभूमीवर विचार करावयाचा झाला तर आलेली संधी म्हणजे एक परदेशी नोकरी, लठ्ठ पगार, बढती, उच्चपदी वर्णी, संसार, ऐषाराम, असा निळ्या झाकणाच्या बाटलीतल्या जंतुविरहित पाण्याप्रमाणे नितळ, गुळगुळीत प्रवासही मोह पाडणारा होता. पण का कुणास ठाऊक, दिलीपनं काही निश्चित विचार करून ती मोहक नोकरी नाकारली. ठाम निर्णय घेऊन कंपनीलाही तसं कळवलं.
लहान वयात दिलीपच्या अंगात तरुणाईची रग होती. ’हा काम ऐकणार नाही,’ याची बाकीच्यांना सवय झालेली. पण वेळ आलीच तर हे सगळं जागच्या जागी रोखून धरण्याची ताकद एकट्या भाऊच्या नजरेत आणि आवाजाच्या टीपेत असायची. भाऊ दिलीपमधल्या सूक्ष्म बदलांकडे लक्ष ठेऊन असायाचा, तसाच दिलीपही भाऊच्या सामाजिक प्रभावानं त्याच्याकडे आतल्या आत आकर्षित होत असावा. थोडीशी खोडसाळ बंडखोरी सोडली तर याच्यात काही तरी वेगळी ठिणगी आहे, हे भाऊला जाणवत होतं. त्याला ते आव्हान वाटायचं, हेही भाऊनं मला मोठेपणी गप्पांमध्ये सांगितलं आहे.
बाबासाहेब (पुरंदरे), भाऊ (श्री. ग. माजगावकर), कुमुद (निर्मला पुरंदरे), यांचं सामाजिक काम आपापल्या मार्गानं पुढं सरकत होतंच. एखाद्या नवख्या वाटसरूला एकाच वेळी, अनेक रस्त्यांचं आकर्षण वाटावं, अशी परिस्थिती रोजच दिलीपसमोर तयार होत होती. त्याचा थोडासा बेदरकार, बंडखोर स्वभाव बिघडायचं म्हटलं, तरी या तीनही रस्त्यांना चुकवू शकत नव्हता. आज, उद्या, नाहीतर परवा दिलीपच्या कर्तृत्वसंपन्न अशा प्रवासाची गाडी या तीनही भक्कम पुलांवरून धावणार, हे बहुधा तेव्हाच निश्चित झालं ह्योतं. दोनही भावांचं एक अनोखं नातं आकाराला येत होतं. कोणत्याही नात्यांच्या कोष्टकात ते बसणारं नव्ह्तं. खरं तर पाच-दहा मिनिटांच्यावर दोघंही एकमेकांच्या समोर थांबत नसत. कबूल करत नसेल, पण दिलीपला भाऊबद्दल एक आदरयुक्त भीती वाटायची. म्हणूनच दोघांच्या मध्ये संकोचाचा एक पडदा निर्माण झाला होता. त्यांना संवादासाठी तिस-या व्यक्तीची गरज भासायची. मी पण ब-याच वेळा ही भूमिका निभवायची. भाऊ गंमतीनं मला बफर म्हणायचा. मध्ये कोणी तरी बफर असल्यावर दोघंही खुलायचे. जे इतर तिथे हजर असायचे, त्यांना दोघांमधली बौद्धिक चमक जाणवल्याखेरीज राहायची नाही. शेरेबाजीसह बोलणं अनेक विषयांना स्पर्शून जायचं. घरातला सासू-सुनेचा कळीचा मुद्दा असो, कधी व्यवसायातली देणीघेणी असोत, कधी माणूस अंकावर आलेली कायदेशीर नोटीस असो, तर कधी डॉक्टरी इलाजासाठी पैशाची जमवाजमव असो, कितीही गंभीर ताण असला तरी, दोघांच्या बोलण्यातून हलका होत असे. प्रश्न मिटलेला नसे, पण तात्पुरती वाट शोधली जात असे.
एकूण दोघंही एकमेकांशिवाय हरवल्यासारखे असायचे. दिलीपचं नुसतं जवळपास असणं भाऊला पुरेसं असायचं. तर भाऊचं नसणं म्हणजे दिलीपला सूर सापडत नसल्याचं जाणवायचं. इतर वेळी एकमेकांचा अभ्यास करणं, एकमेकांना नकळत न्याहाळणं, न सांगताच दुस-याची अडचण ओळखणं, पहिल्याची काळजी करणं, असं गुंतागुंतीचं नातं दोघांमध्ये एकाच वेळी विणलं जात असावं. दिलीपचं वाचन, हुषारी, निरीक्षण या सगळ्या बाबींचा भाऊ मनापासून अंदाज घेत होता, आपल्याबरोबर पुढच्या वाटचालीत दिलीप असावा, ही त्याची इच्छा होती, स्वप्नं होतं. पण ते दिलीपच्या पुढाकारानंच प्रत्यक्षात येणं त्याला अभिप्रेत असावं. त्यासाठी भाऊनं आपला एकही शब्द खर्ची घातलेला नसावा. आपल्यापेक्षा जास तडफेनं दिलीप या क्षेत्रात काम करेल, याबद्दल भाऊला ठाम खात्री होती. दिलीपचा निवडक मित्र परिवार, उत्तम आणि दर्जेदार वाचनाकडे कल, आपलं म्हणणं विचारपूर्वक पटवून देण्याची हातोटी, मत मांडण्याची पद्धत, हे सर्व आपल्या व्यवसायाशी, ध्येयवादाशी कुठे तरी निगडित आहे, असं भाऊला वाटायचं. मात्र दिलीपच्या स्वागतासाठी उत्सुक असलेला भाऊ त्याच्या बाबतीत निमंत्रणाचा धोका पत्करायला तयार नव्हता. ’सावध’पणा हा स्वभाव विशेष आमच्या आईनं दोन्ही भावांमध्ये खुबीनं पेरलेला असावा. पुढील सहप्रवासात दोघाही भावांनी तो अतिशय कौशल्यानं हाताळलेला दिसतो.
सरतेशेवटी साधारण १९६६ साली दिलीप ख-या अर्थानं भाऊचा साहाय्यक म्हणून ’माणूस’ मध्ये प्रवेशकर्ता झाला. शेवटी काळाची, वेळेची म्हणून काही मागणी असतेच. तसा ’माणूस’ला आलेला ’एकसुरीपणा’ बदलायला हवा होता. याच बाजूवर दिलीपनं काम करणं अपेक्षित होतं. एकमेकांना समजून घेण्याची क्षमता दोघाही भावांमध्ये पूर्णपणे असल्यामुळे ’निर्णयस्वातंत्र्य’ ही दिलीपची गरज भाऊनं ओळखली होतीच. दिलीप स्वत:च्या पद्धतीनंच काम करणार होता. जाहिरातींना आपल्याकडे वळवण्यासाठी ’माणूस’चं दृश्यरूप बदलायला हवं होतं. रंगीत मुखपृष्ठाबरोबर हाताला गुळगुळीत स्पर्शही हवा होता. चित्रपट विषयांचा अंतर्भाव करून थोडासा चटपटीत मजकूरही भुरभुरायला पाहिजे होता. गंभीर मजकुराबरोबर हलकं फुलकं विनोदी लिखाण, कागदाचा दर्जा आणि पृष्ठसंख्या अशा अनेक बाबींवर दिलीपनं परिश्रम घ्यायला हवे होते. सर्वात महत्वाचं म्हणजे यासाठी लागणारं आर्थिक धाडस पेलायला हवं होतं.
भाऊला नेहेमीच नशिबाशी खेळ करत जगणं आवडायचं. आपल्याला प्राक्तन प्रतिकूल होतय असं वाटलं की तो जास्तच इरेला पेटायचा. सतत टोकाची भूमिका घ्यायचा. परिणाम आणि निर्णय चुकले तरी त्याला पर्वा नसायची. घरगुती असो, वैयक्तिक असो वा व्यावसायिक असो, त्याचा हट्टीपणा अवेळी आणि त्रासदायक आहे, असं जाणवत असे. कोणतीही तडजोड करणं म्हणजे आपण हार पत्करली, असंच त्याला वाटायचं. याउलट दिलीपनं स्वत:ला समजायला लागल्यापासून केलेली वाटचाल ही नशिबाचा कौल लक्षात घेऊन केलेली दिसते. स्वत:चा निर्णय कृतीत आणताना त्यानं नियतीचा कौल प्रमाण मानलेला आहे. प्रसंगी तशीच वेळ आली, तर पांढरं निशाण दाखवून तो मोकळादेखील होतो.
हा मूळ वृत्तीतला फरक, की मोठ्याच्या अनुभवातून धाकट्यात झालेला बदल आहे, कुणास ठाऊक! काहीही असो, पण एकमेकांच्या नातेसंबंधात किंवा व्यवसाय प्रवासात हा फरक कधीही आड आलेला नाही.
दिलीप मनात म्हणायचा, ’मी करायचं ठरवतोय, बघूया उद्या श्रीभाऊ काय म्हणतोय ते’, तर भाऊ म्हणायचा, ’हे धाडस बहुधा दिलीपच्या अंगावर येणारसं दिसतय, पण करू देत. तयारी तर दिसतेय! आणि आपण आहोतच.’
असं कौतुक आणि आदर दोघांकडूनही सांभाळला जायचा.

No comments:

Post a Comment