Monday 23 August 2010

हेडहंटर

हेडहंटर : गिरीश टिळक
राजहंस प्रकाशन
पृष्ठे : १९९, मूल्य : २०० रुपये

देहाला खरोखरच विश्रांती हवी होती. पण मनाला काय हवं होतं कुणास ठाऊक? आठवडाभरातलं ते झोपणं कंटाळवाणं होतं खरं. पण मनाला आल्हाद मिळण्याऐवजी उद्विग्नताच भरून आली. विचित्र हिशेब मन मांडू लागलं. ’सिग्मा’नं अनपेक्षित वेतनवाढी दिल्या ख-या, पण आपण ’सिग्मा’चा काही कोटींचा फायदा करून दिला आहे. तो फायदा, आपण पुरवठादारांकडे पैसे न खाल्ल्यामुळेच केवळ मिळाला आहे असं नाही, तर आपले गृप्समधले वा अन्यत्रचेही संपर्कमैत्र वापरून कंपनीला सुयोग्य पुरवठादार मिळवून देऊनही करून दिला आहे. ’हेडहंटिंग’ नव्हे ’पुरवठादारांचं हंटिंग’ मिळवून दिलेला फायदा हा प्रचंड आणि चिरस्थायी आहे. ’सिग्मा’सारख्या आधी सुस्थापित असलेल्या कंपनीला आपल्या संपर्कमैत्रांमुळे फायदा करून देण्यात जिंदगी घालवण्यापेक्षा ’रिझ्युमे’सारख्या सुस्थापित होऊ घातलेल्या कंपनीला वर आणण्यासाठी ते वापरणं हे अधिक आनंदाचं आहे. ’पुरवठादारांचं हंटिंग’ नव्हे, तर हेड हंटिंग’! त्यासाठी आपल्याला भागीदारी द्यायलाही उत्सुक असल्याचं उदय जर खुलेपणानं म्हणाला होता...तर सोडावी का नोकरी? पत्करावा का धोका? ’रिझ्युमे’त काम किती सुखात असायचो आपण! आणि जातीनं खुद्द आपणच राबत असूनही किती कमी वेळात कामं व्हायची तिथली! इथल्या इतकं पूर्ण वेळ तिथेच राबलो तर ’नोकर’ म्हणून जिंदगी काढण्यापेक्षा ’मालक’ म्हणून सहभागी होण्याची उदयनं देऊ केलेली संधी नाकारण्याचा करंटेपणा का म्हणून दाखवावा आपण? हे आणि असे प्रश्न घेऊनच दहा - बारा दिवसांच्या विश्रांतीनंतर मी ’सिग्मा’त हजर झालो.
त्या पूर्ण दिवसभर मी माझ्या नेहेमीच्या शिस्तीनं, क्षमतेनं मनापासून काम करत होतो खरं, पण हेही खरं आहे की अधून मधून ’रिझ्युमे’चं पुण्याचं ऑफिस मला आठवत राहायचं. ’बोरिंघर’ला मी मिळवून दिलेला मटेरियल्स मॅनेजरही आठवत राहायचा आणि असं काहीबाही कित्येक! अखेर संध्याकाळी मी उदयच्या कार्यालयात गेलो. त्या दिवशीचं माझं सात वाजताचं निघणं ’आजारातून नुकताच उठलाय’ या कारणावर खपून गेलं. मी म्हणालो, ’उदय, मी जर ’सिग्मा’तली नोकरी सोडली तर... पूर्वी जी संधी तू मला देऊ केली होतीस, ती मी आजही कायम आहे असं गृहीत धरू का?’
’निश्चितच. दिलेला शब्द हा तारीख न घातलेला बेअरर चेकच असतो. तुझं इथे केव्हाही स्वागतच आहे. कधी सोडतोयस नोकरी?’
’लगेचच सोडायचा विचार आहे माझा.’
’लगेचच रुजू हो आपल्याकडे. पहिल्या महिन्यापासून तुला आणि मला मिळणारा पगार सारखाच असेल. आपल्या दोघांच्याही पगाराखेरीजच्या सुखसोयी सारख्या असतील. भागीदारी किती टक्के असेल ते थोड्या काळानंतर सांगेन मी. एवढं नक्की, ’रिझ्युमे’त तू रुजू होशील तो एम्प्लॉयी म्हणून नाही तर भागीदार म्हणूनच.’
त्यानंतर दुस-याच दिवशी मी ’सिग्मा’चा राजीनामा दिला. एक महिन्याची पूर्वसूचना देणं आवश्यक होतं. त्या महिनाभर मी ’सिग्मा’त जात होतो. मोडकसाहेब-कौलगीसाहेब, दोघांनीही माझं मन वळवायचा खूप प्रयत्न केला, पण माझा निर्णय पक्का होता. राजीनामा त्यांना स्वीकारावा लागला. तो सहजासहजी स्वीकारला गेला नाही तो आमच्या घरातून. मी राजीनामा देणार असल्याचं घरात जाहीर केलं, म्हणजे तो देऊन टाकला असल्याचं लपवून ठेऊन ’देण्या’चा विचार असल्याचं सांगितलं. तेव्हा तो अविचारच कसा आहे, हे पटवून देण्याची घरात अहमहमिकाच लागली. ’अर्धवेळ काम करत होतास तसं पुन्हा करू लाग’, ’मागे एकदा ’शेअर्स’च्या व्यवसायात धिंडवडे निघाले होते ते आठवत नाहीत का’, उत्तम नोकरी सोडून धंद्यात ’पडण्याचा’ हा कसला दळभद्री विचार’, ’अरे, तुझं बालपण आठव. कसलीच अपेक्षा नव्हती आम्हाला तुझ्याकडून. आता स्वत:च्या पायावर उभा आहेस, तर करंटेपणानं कशाला निमंत्रण द्यावं’, ’आता तू एकटा नाहीस, संसार आहे तुझ्या खांद्यावर’, अशी नाना परींनी ’भवति न भवति’ झाली. कोण काय बोललं याला महत्व नसून घरातून उमटलेली एकूण प्रतिक्रिया महत्वाची नोती.
ती एवढी दाहक होती की घरात त्या काळात पूर्ण अबोला पसरला. त्या काळात घरात मी एक नगण्य, बेजबाबदार, हेकेखोर असा घटक ठरून गेलो. अशा घरात हे घडलं होतं की परस्पर आस्था आणि एकोपा हे जिथले स्थायीभाव होते. नारळाच्या ताटभर वड्या केल्या गेल्या तर ते कापलेले चौकोन ठेवण्यासाठी आईला डब्याची कधीच नेमणूक करावी लागली नाही. वड्या सुकण्यापूर्वीच उभं घर जुगलबंदी लागावी तसं खाऊन टाकायचं. वडीइतकाच तो सहस्वादाचा सोहळा मधुर, रसाळ असायचा. मऊ, ओलसर पोटातून गरम असणा-या त्या वड्या ताटातून खाताना, वड्या बनवताना घरात कोंडून राहिलेला वेलचीचा वासही ओसरून गेलेला नसायचा, तो साथीला असायचा... त्या अस्वस्थ - अशांत पर्वकाळात कुणीतरी कोवळे नारळ आणून दिले, म्हणून असावं, आईनं वड्यांचा घाट घातला. नेहेमीप्रमाणे ताट आणून बाहेर हॉलमध्ये पंख्याखाली ठेवलं. वेलचीचा गोड वास तर तोच आणि नेहेमीप्रमाणे दरवळत होता. तिथेच अवती भवती सगळी माणसं बसलेली होती. पण ताटापाशी जाऊन वड्यांना स्पर्श करण्याची कुणालाच इच्छा झाली नाही. जणू वड्यांची गोडी हरवली होती. वास्तवात घरातलीच गोडी हरबून गेली होती. या भयकारी स्थितीला आपणच कारण आहोत, असं मला वाटत राहिलं. मात्र आपला निर्णय अचूक आहे याची खात्री मला सावरत राहिली.

No comments:

Post a Comment